Asaduddin Owaisi : "फक्त बोलू नका, तर..." दहशतवादाविरुद्ध असदुद्दीन ओवैसींची सरकारला स्पष्ट मागणी

Asaduddin Owaisi : "फक्त बोलू नका, तर..." दहशतवादाविरुद्ध असदुद्दीन ओवैसींची सरकारला स्पष्ट मागणी

असदुद्दीन ओवैसींची सरकारकडे दहशतवादाविरुद्ध कठोर आणि निर्णयात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

छ संभाजीनगर दौऱ्यावर असताना एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी आतंकवाद,पाकिस्तान आणि भारत सरकारच्या धोरणावर स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारला जोरदार इशारा दिला, "फक्त बोलू नका, आता निर्णायक पावले उचला." असे म्हणत सरकारला धाडशी निर्णय घेण्याचा सल्ला दिला आहे.

ओवैसी यांनी पाकिस्तानवर थेट आरोप करत म्हटले, "आतंकवादी पाकिस्तानमध्ये तयार होतात. त्यांना तेथून प्रशिक्षण, आर्थिक पाठबळ आणि सर्वतोपरी मदत मिळते." त्यांनी स्पष्ट केले की भारताविरुद्ध कारवाया घडवणाऱ्या गटांना पाकिस्तानमध्ये राजकीय पाठिंबा आहे. "सरकारने सर्वपक्षीय बैठक घेतली असताना सर्व विरोधी पक्षांनी एक सूर लावला, आता केवळ चर्चा नाही, ठोस कारवाई हवी!" असे ठाम मत ओवैसी यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, "सरकारला आम्ही मोकळे हात दिले आहेत. युद्धाचा निर्णय घ्यायचा की नाही यावर सरकार ठोस भूमिका हा सरकारवर निर्भर आहे, पण दहशतवादाचा कायमचा नायनाट झाला पाहिजे."

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्यावर निशाणा साधताना ओवैसी म्हणाले, "दहशतवाद्यांनी त्यांच्या आईचा बळी घेतला, तरीही त्यांना आजही दहशतवादाचे भयाण परिणाम पूर्णपणे उमगलेले नाहीत. आज भारतातील निष्पाप नागरिकांचे रक्त सांडणारे आणि त्यांच्या आईला मारणारे दहशतवादी वेगळे नाहीत." धर्माच्या आधारे होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध करताना ओवैसी म्हणाले, "जात वा धर्म बघून कुणावरही अत्याचार करणं हा मानवतेवर कलंक आहे. भारतात हिंदू-मुस्लिम द्वेष पसरवण्याचा कट पाकिस्तानातील दहशतवादी संघटना रचत आहेत. आम्ही या कृत्यांचा जोरदार निषेध करतो."असे ओवेसी म्हणाले.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात संभाव्य युद्धाच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना ओवैसी म्हणाले, "युद्धाचा निर्णय सरकारवर सोडलेला आहे. मात्र आमची अपेक्षा एकच, सरकारने जो काही निर्णय घ्यावा, तो दीर्घकालीन शांतता आणि दहशतवादाच्या समूळ निर्मूलनासाठी असावा." पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर दडपशाहीत आणण्यासाठी ओवैसी यांनी भारत सरकारला आवाहन केले की, "पाकिस्तानला FATF च्या ग्रे लिस्टमध्ये कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करा. अवैध पैशांमुळे दहशतवादाला बळ मिळतेय, यावर कडक कारवाई झाली पाहिजे."

शहीद आफ्रिदीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ओवैसी यांनी उपरोधाने म्हटले, "कोण आहे हा शहीद आफ्रिदी? या जोकराचे नाव घेऊन वेळ वाया घालवू नका." वक्फ संपत्तीबाबत भूमिका मांडताना त्यांनी सांगितले, "जसे पंढरपूरच्या मंदिर ट्रस्टमध्ये नॉन-हिंदू ट्रस्टी असू शकत नाहीत, तसेच वक्फ मालमत्तांवर नॉन-मुस्लिम हस्तक्षेप असू नये." तसेच, लीमिटेशन ॲक्ट व नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांवरही त्यांनी टीका केली, "वक्फची मालमत्ता हिसकावून घेणे चुकीचे आहे." असे मत ओवेसी यांनी व्यक्त केले

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com