आजपासून औरंगाबाद शहरातील रिक्षाचालक बेमुदत संपावर
औरंगाबादेत रिक्षाचालकांनी संप पुकारला आहे. या संपात तब्बल 15 रिक्षा चालक संघटनांचा सहभाग पाहायला मिळत आहे. आज सकाळपासून रिक्षा बंद ठेवण्याची घोषणा औरंगाबाद रिक्षा चालक-मालक संघटनेने केली आहे.
अनेकदा रीतसर निवेदन देऊन देखील आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शहरातील विविध 15 रिक्षा चालक-मालक संघटनांनी आजपासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे. रिक्षाचे इन्शुरन्स, पीयुसी, टॅक्स, मीटर कॅलिब्रेशन करणे, फिटनेस, वाहन पासिंग करणे इत्यादी कागदपत्रांसाठी 28 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ मिळाली तर सर्व वाहन चालक व मालकांना दिलासा मिळू शकतो,अशी प्रमुख मागणी रिक्षाचालक संघटनेकडून करण्यात आली आहे.
ट्रॅफिक पोलिसांकडून सुरू असलेली मोहीम बंद करून रिक्षा चालकांना होणारा मनस्ताप थांबवण्याची मागणी सुद्धा रिक्षाचालक संघटनांनी केली आहे. वारंवार मागण्या करूनही रिक्षा चालकांच्या समस्या सोडवण्यास प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप रिक्षा चालक-मालक समितीतर्फे करण्यात आला आहे.