Bhaskar Jadhav : 'हा दोन भावांच्या इच्छेचा प्रश्न,जो निर्णय घेतील त्याला समर्थन' भास्कर जाधवांचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळचं वळण पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांचे वक्तव्य आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अभिनेते महेश मांजरेकर यांनी 'वास्तव में Truth' या कार्यक्रमात राज ठाकरे यांची मुलाखत घेतली.
या मुलाखतीत राज ठाकरे म्हणाले होते की, "कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातील गोष्टी किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यामध्ये मला काही फार कठिण गोष्ट आहे असं वाटत नाही. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे, "असं राज ठाकरे म्हणाले.
या त्यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी देखील किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे, असं म्हटलं आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहेत.
"जो निर्णय पक्षप्रमुख गेतील त्याला आमचं समर्थन असेल"
याचपार्श्वभूमिवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भास्कर जाधव म्हणाले की, "राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याचं स्वागत महाराष्ट्रातील मराठी माणूस करेल. हा त्या दोन भावांच्या इच्छेचा प्रश्न आहे, कारण त्या दोन भावांनी हा निर्णय घ्यायचा आहे. शिवसेनेने कधीच महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या हितापुढे काही दुसरा विचार केला नाही, त्यामुळे राज ठाकरे यांनी मांडलेली भूमिका ही पुढे गेली तर ती नक्कीच महाराष्ट्राच्या हितासाठी असेल. हे दोन भाऊ वेगळे झाले हे महाराष्ट्रातील माणसाला झालेलं सर्वात मोठ दुःख आहे. याला बराच कालावधी उलटून गेला असून त्यादरम्यान अनेक घटना देखील या दोन्ही पक्षात होऊन गेल्या आहेत. दोन्ही भावांना अनेक गोष्टींचा अनुभव आलेला आहे. त्यामुळे या दोन्ही भावांनी आपला अनुभव समजून घेऊन त्यावर राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे आमची भांडण किरकोळ असल्याप्रमाणे आता महाराष्ट्राचा विचार केला पाहिजे".