Eknath Shinde : राजकीय भूकंप! एकनाथ शिंदेंच्या खेळीने विरोधक हादरले, शिंदे शिवसेनेत प्रवेशाचा पाऊस
Eknath Shinde : राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतींचे निकाल जाहीर झाले असून, या निकालांमध्ये महायुतीने मोठं यश मिळवलं आहे. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष येत्या महानगरपालिका निवडणुकांकडे लागलं आहे. राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून, 16 जानेवारीला निकाल समोर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे.
दरम्यान, नवी मुंबई महापालिका निवडणुकीआधी ठाकरे गटाची शिवसेना आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या दोन्ही पक्षांतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश
नवी मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना सक्रिय झाली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐरोली परिसरात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत, नगर परिषद निवडणुकांप्रमाणेच महापालिकेतही शिवसेनेचा विजय निश्चित करण्यासाठी जोमाने काम करा, असं आवाहन केलं.
या कार्यक्रमात ठाकरे गटाची शिवसेना, शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस तसेच इतर पक्षांतील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामध्ये नामदेव भगत, रमाकांत म्हात्रे, मनोज हळदणकर, विजय माने आणि शीतल कचरे यांचा प्रमुख सहभाग होता.
सर्वांनी एकत्र येऊन काम करावं – शिंदे
पक्षप्रवेशानंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मिळालेल्या एकत्रित जागांपेक्षा शिवसेनेने अधिक जागा जिंकल्या आहेत. यावरून नवी मुंबईत शिवसेनेची ताकद वाढताना दिसत आहे. त्यामुळे निष्काळजी न होता सर्वांनी एकजुटीने कामाला लागावं, असं त्यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले की, या निवडणुकांमधून ‘खरी शिवसेना कोणाची’ हे जनतेने स्पष्ट केलं आहे. महाविकास आघाडीचा आकडा कमी राहिला, तर शिवसेनेला त्यापेक्षा जास्त पाठिंबा मिळाला आहे. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनंतर आता महापालिकेतही महायुतीचाच विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवसेना म्हणजे कार्यकर्त्यांचा पक्ष
एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, शिवसेना हा आदेश देणाऱ्यांचा नव्हे, तर मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. जो काम करतो, त्यालाच संधी मिळते. गेल्या अडीच वर्षांत नवी मुंबईसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. सिडकोची घरं, एफएसआयमध्ये वाढ, टोल नाक्यांची हटवणूक, पूल आणि रस्त्यांची कामं, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ‘तिसरी मुंबई’ प्रकल्प हे नवी मुंबईच्या विकासासाठी महत्त्वाचे ठरत असल्याचं त्यांनी सांगितलं.
या कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के, माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, शिवसेना उपनेते विजय नहाटा, जिल्हाप्रमुख किशोर पाटकर, द्वारकानाथ भोईर, अंकुश कदम यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना, माजी नगरसेवक आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

