Maharashtra Weather Update : राज्यातील वातावरणात मोठा बदल, उकाडा-थंडी-पावसाचा विचित्र खेळ

Maharashtra Weather Update : राज्यातील वातावरणात मोठा बदल, उकाडा-थंडी-पावसाचा विचित्र खेळ

राज्यातील हवामानात सध्या मोठ्या प्रमाणावर बदल पाहायला मिळत आहे. कधी थंडी, कधी उकाडा तर कधी ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाच्या सरी
Published by :
Varsha Bhasmare
Published on

राज्यातील हवामानात सध्या मोठ्या प्रमाणावर बदल पाहायला मिळत आहे. कधी थंडी, कधी उकाडा तर कधी ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाच्या सरी असा संमिश्र अनुभव नागरिक घेत आहेत. डिसेंबर महिन्यात राज्यात चांगली थंडी जाणवत होती, मात्र जानेवारीच्या सुरुवातीपासूनच हवामानात बदल होऊ लागला. फेब्रुवारी महिन्यात थंडी कमी-जास्त राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने आधीच वर्तवला होता आणि तो आता प्रत्यक्षात दिसून येत आहे.

राज्यात सध्या सकाळच्या वेळी हलकी थंडी जाणवते, तर दुपारच्या सुमारास तापमानात वाढ होऊन उकाडा जाणवतो. काही भागांत ढगाळ वातावरण असून अधूनमधून अवकाळी पावसाच्या सरीही कोसळत आहेत. १ जानेवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात मोठा बदल झाला आणि त्यानंतरही काही दिवस ढगाळ वातावरण कायम आहे. यासोबतच, राज्यातील काही शहरांमध्ये वायू प्रदूषणाची पातळीही चिंताजनक वाढलेली आहे.

आज राज्यातील तापमानाची स्थिती

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज राज्यात तापमानात चढ-उतार पाहायला मिळणार आहेत. महाराष्ट्रातील निफाड येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून ते 10.8 अंश सेल्सिअस इतके आहे. तर कोकणातील भिरा येथे उच्चांकी तापमान 37 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. त्यामुळे राज्यात थंडी आणि उकाडा यांचा विचित्र संगम पाहायला मिळत आहे. देशपातळीवर पाहता, राजस्थानमधील सिकार येथे देशातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून ते 4.5 अंश सेल्सिअस इतके आहे. उत्तर भारतात थंडी आणि धुक्याचा प्रभाव कायम असून, काही भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पावसाचा आणि हिमवृष्टीचा इशारा

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 6 फेब्रुवारी ते 9 आणि 11 फेब्रुवारी दरम्यान जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या पश्चिम हिमालयीन भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. या भागांमध्ये पुढील काही दिवस खराब हवामान राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नागरिकांनी घ्यावी काळजी

राज्यातील शेतकरी, नागरिक आणि प्रवाशांनी हवामानातील बदल लक्षात घेऊन योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान होण्याची शक्यता असून, आरोग्यावरही याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उष्णता, थंडी आणि प्रदूषणापासून संरक्षणासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com