Global Food Market : महागाईला ब्रेक! जागतिक अन्नधान्याच्या किमती सलग पाचव्या महिन्यात घसरल्या
जागतिक महागाईच्या झळा सहन करणाऱ्या भारतासह जगभरातील कोट्यवधी नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेच्या (FAO) ताज्या अहवालानुसार, जागतिक अन्नधान्याच्या किमती सलग पाचव्या महिन्यात घसरल्या आहेत. दूध, साखर आणि मांस यांसारख्या जीवनावश्यक अन्नपदार्थांच्या किमतीत झालेल्या घटेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत काही प्रमाणात स्थिरता निर्माण झाली आहे. एफएओच्या अहवालानुसार, जागतिक स्तरावर अन्नपदार्थांच्या किमतीतील मासिक चढउतार दर्शवणारा FAO Food Price Index जानेवारी २०२६ मध्ये सरासरी १२३.९ अंकांवर आला आहे. हा निर्देशांक डिसेंबर २०२५ च्या तुलनेत ०.४ टक्के तर गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ०.६ टक्के कमी आहे. त्यामुळे जागतिक अन्नमहागाई काही प्रमाणात नियंत्रणात येत असल्याचे चित्र दिसत आहे.
अहवालात नमूद केल्यानुसार, दूध, साखर आणि मांसाच्या किमतींमध्ये सातत्याने घसरण होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात पुरवठा वाढल्याने आणि मागणी तुलनेने स्थिर राहिल्याने या वस्तूंच्या दरांवर दबाव कमी झाला आहे. याचा थेट फायदा अन्न आयात करणाऱ्या देशांना, विशेषतः भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थांना होऊ शकतो. मात्र, सर्वच अन्नपदार्थांच्या किमती घसरल्या आहेत असे नाही. जानेवारी २०२६ मध्ये धान्याच्या किमतींमध्ये ०.२ टक्क्यांची किरकोळ वाढ नोंदवण्यात आली असून, धान्य किंमत निर्देशांक सरासरी १०७.५ अंकांवर राहिला. गहू आणि मक्याच्या किमती मात्र किंचित घटल्या आहेत. एफएओच्या मते, रशिया आणि अमेरिकेतील हवामानाशी संबंधित चिंतेचा फारसा परिणाम बाजारावर झाला नाही, कारण जागतिक गव्हाचा साठा पुरेसा आहे.
अर्जेंटिना आणि ऑस्ट्रेलियामध्ये अपेक्षित चांगल्या उत्पादनामुळे तसेच उच्च जागतिक साठ्यांमुळे धान्याच्या किमती नियंत्रणात राहण्यास मदत झाली आहे. मात्र, तांदळाच्या किमतींमध्ये १.८ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. विशेषतः सुगंधी तांदळाच्या वाढत्या मागणीमुळे बाजार मजबूत झाल्याचे एफएओने स्पष्ट केले आहे. यामुळे आशियाई देशांमध्ये तांदळाच्या किमतींवर दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, भारताच्या दृष्टीने ही घसरण महत्त्वाची ठरू शकते. दूध, साखर आणि मांसाच्या जागतिक किमती कमी झाल्याने आयात खर्चात घट होण्याची शक्यता आहे.
विशेषतः साखर उत्पादनात भारताने केलेली वाढ, मजबूत देशांतर्गत पुरवठा आणि सुधारित निर्यातीच्या संधी यामुळे शेतकरी आणि साखर उद्योगाला फायदा होऊ शकतो. तज्ञांच्या मते, सलग पाचव्या महिन्यात अन्न किमती घसरल्याने महागाईला काही प्रमाणात ब्रेक लागला असला, तरी येत्या काही महिन्यांत हवामान, भू-राजकीय तणाव आणि जागतिक मागणी यावर किमतींची दिशा अवलंबून असेल. त्यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी पूर्णपणे महागाईचा धोका टळलेला नाही, असे मत व्यक्त केले जात आहे.
