Air India ची साडेसाती काही संपेना ! धुराचा वास आणि पुढे जे काही घडलं ते...
एअर इंडियाच्या मुंबईहून चेन्नईकडे जाणाऱ्या AI639 या प्रवासी विमानाला तांत्रिक अडचणीमुळे उड्डाणानंतर काही वेळातच मुंबई विमानतळावर परत आणावे लागले. शुक्रवारी उड्डाणादरम्यान विमानाच्या केबिनमध्ये धुरासारखा वास आल्याची माहिती समोर आली असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्वरित पावले उचलण्यात आली.
एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाव्य धोक्याची शक्यता लक्षात घेऊन वैमानिकांनी काळजीपूर्वक निर्णय घेतला आणि विमान सुरक्षितपणे मुंबई विमानतळावर उतरवण्यात आले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये थोडा गोंधळ उडाला असला तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही.
प्रवाशांचा प्रवास अडथळा न होता पूर्ण व्हावा यासाठी विमान कंपनीने तत्काळ पर्यायी विमानाची व्यवस्था केली. तसेच, ग्राउंड स्टाफने प्रवाशांना आवश्यक ती मदत आणि माहिती पुरवली. प्रवाशांच्या सोयीचा विचार करत त्वरित हालचाली करण्यात आल्या. याच दिवशी एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानातही एक अज्ञात सुरक्षा इशारा मिळाल्याची नोंद झाली. मात्र, संपूर्ण सुरक्षा तपासणीनंतर त्या विमानाला उड्डाणासाठी हिरवा कंदील देण्यात आला.
एअर इंडियाकडून स्पष्ट करण्यात आले की, “प्रवाशांचे आणि कर्मचाऱ्यांचे संरक्षण हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे,” असे सांगत कंपनीने आपल्या सुरक्षा प्रणालीवर पूर्ण विश्वास असल्याचे नमूद केले आहे. संपूर्ण घटनेत तात्काळ उपाययोजना केल्यामुळे संभाव्य मोठा अपघात टळला असून, प्रवासी सुखरूप आहेत. संबंधित घटनेची सखोल चौकशी करण्यात येत आहे.