Toll Payments : टोल नाक्यावर रोख व्यवहार बंद? 1 एप्रिलपासून फक्त डिजिटल पेमेंटची व्यवस्था
देशातील राष्ट्रीय महामार्गांवर टोल वसुलीमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) १ एप्रिल २०२६ पासून रोख व्यवहार पूर्णपणे बंद करण्याच्या तयारीत आहे. यानंतर, देशभरातील टोल प्लाझांवर फक्त FASTag किंवा UPI सारख्या डिजिटल माध्यमांद्वारेच टोल भरणे शक्य होणार आहे. हा निर्णय डिजिटल टोलिंग इकोसिस्टम स्थापन करण्याच्या NHAI च्या व्यापक योजनेचा भाग आहे.
का बंद करणार रोख व्यवहार? NHAI च्या प्राथमिक अहवालानुसार, रोख व्यवहारांमुळे टोल नाक्यांवर गाड्यांची गर्दी वाढते. परिणामी प्रवाशांना टोल भरण्यासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागते. अनेक ठिकाणी रोख व्यवहारामुळे वाद, गोंधळ आणि अगदी मारहाण देखील झाल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे फक्त डिजिटल माध्यमांचा वापर केला तर व्यवहार पारदर्शक होईल, वाद टळतील आणि वाहतूक सुरळीत होईल. देशभरातील १,१५० हून अधिक टोल प्लाझांवर या निर्णयाचा थेट परिणाम होऊ शकतो. सध्या अंदाजे ९८% टोल वसुली FASTag द्वारे केली जाते, तर बऱ्याच ठिकाणी UPI पेमेंट सुविधाही उपलब्ध आहे, ज्यामुळे प्रवाशांना पर्यायी डिजिटल पर्यायही मिळतात.
डिजिटल पेमेंटचे नियम
राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमांनुसार, FASTag नसलेल्या वाहनांना टोल नाक्यावर प्रवेश केल्यास दुप्पट रक्कम भरावी लागते. त्याचप्रमाणे, UPI द्वारे पेमेंट करणाऱ्या वाहनचालकांना १.२५ पट रक्कम आकारली जाते. प्रस्तावित उपक्रमामुळे टोल नाक्यांवर वाहनांची वाहतूक जलद होईल, टोल कामकाजात पारदर्शकता येईल, आणि आर्थिक गैरव्यवहार टळतील असे NHAI ने स्पष्ट केले आहे. NHAI च्या डिजिटल टोलिंग योजनेत उच्च-कार्यक्षमता, तंत्रज्ञान-आधारित नेटवर्क तयार करण्यावर भर दिला गेला आहे. अधिकृत अधिसूचना जाहीर झाल्यानंतरच अंमलबजावणीबाबत अंतिम चित्र स्पष्ट होईल. तरीही, प्रवाशांनी लवकरात लवकर FASTag किंवा UPI पेमेंटची तयारी सुरू करणे फायदेशीर ठरेल.
प्रवाश्यांसाठी टिप्स
FASTag असलेल्या वाहनांसाठी टोल भरणे जलद आणि सुलभ राहील.
UPI द्वारे पेमेंट करणाऱ्यांसाठी पर्यायी पर्याय उपलब्ध आहे.
रोख न घेणाऱ्या नव्या नियमामुळे टोल नाक्यावर वाहनांची गर्दी कमी होईल, प्रवास अधिक आरामदायक होईल.
