पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारची निर्णायक भूमिका; पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारची निर्णायक भूमिका; पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द

केंद्र गृह मंत्रालयाकडून या निर्णयासंदर्भात अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत.
Published by :
Shamal Sawant
Published on

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने कठोर पावलं उचलत, पाकिस्तानशी संबंधित सर्व व्हिसा तत्काळ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र गृह मंत्रालयाकडून या निर्णयासंदर्भात अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा करत, त्यांच्या राज्यांमध्ये असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची त्वरित शोध मोहीम राबवण्याचे व त्यांना त्यांच्या मायदेशी परत पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.

सुरक्षा बैठकीत निर्णायक भूमिका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उच्चस्तरीय सुरक्षा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या विस्तृत चर्चेनंतर पाकिस्तानशी संबंधित सर्व व्हिसा रद्द करण्यात आले असून, भारतात उपस्थित असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना 1 मे 2025 पर्यंत देश सोडण्याचा अंतिम आदेश देण्यात आला आहे.

सिंधू जल समझोता स्थगित, अटारी सीमा बंद करण्याचा निर्णय

भारत-पाकिस्तान दरम्यान 1960 मध्ये झालेला सिंधू जल समझोता देखील तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. या कराराच्या माध्यमातून सिंधू नदीच्या प्रवाहाचे व्यवस्थापन करण्यात येते, जी पाकिस्तानसाठी पाण्याचा मुख्य स्त्रोत मानली जाते. या निर्णयामुळे पाकिस्तानच्या जलसुरक्षेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त भारत सरकारने अटारी सीमा बंद करण्याचाही निर्णय घेतला असून, भारतात येणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना परत जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हल्ल्यानंतरचा निर्णायक व आक्रमक पवित्रा

या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. त्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही धोरणात्मक पावले उचलली जात आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com