चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करण्याचे आदेश
अनिल ठाकरे, चंद्रपूर
चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करून आयोगापुढे सादर करण्याचे राष्ट्रीय जनजाती आयोगाचे आदेश आहेत. जिल्ह्यातील जिवती तालुक्यातल्या कुसुंबी गावातील आदिवासीच्या जमीन प्रकरणात दिला आदेश, एका सिमेंट कंपनीने ही जमीन बेकायदेशीररीत्या संपादित केल्याप्रकरणी प्रकरण सुरू आहे.
राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाने समन्स जारी करूनही त्याचे पालन न केल्याप्रकरणी आयोगाने हा आदेश दिला आहे. पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांना अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयोगाच्या या आदेशामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
16 फेब्रुवारीला आयोगापुढे हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र आयोगापुढे जिल्हाधिकारी स्वतः हजर झाले नाहीत, त्यांच्या जागी उपजिल्हाधिकारी तृप्ती सूर्यवंशी हजर झाल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना अटक करुन 2 मार्चपर्यंत आयोगापुढे सादर करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना दिले आहेत.