Chandrashekhar Bawankule : मराठवाड्यात भाजप मोठा भाऊ ठरेल चंद्रशेखर बावनकुळे यांचा खळबळजनक दावा
महाराष्ट्र नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहे. या निवडणुकांचा प्राथमिक कल आणि जनमताचा अंदाज घेता भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीच्या ऐतिहासिक विजयाचा दावा केला आहे. भाजप मराठवाड्यात मोठा भाऊ म्हणून समोर येईल, असे विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. जालन्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेच काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले.
राज्यातील महायुती सरकारच्या विकासकामांवर पूर्ण विश्वास
महाराष्ट्राच्या राजकारणाला आजचे निकाल हे नवी दिशा देणारे ठरतील. केवळ महायुती सत्तेत येणार नाही, तर ५१ टक्क्यांहून अधिक मताधिक्य दोन तृतीयांश बहुमत मिळवून घेईल. जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील महायुती सरकारच्या विकासकामांवर पूर्ण विश्वास दाखवला आहे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी असे विधान केले.
यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठवाड्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले. मराठवाड्यात महायुतीची कामगिरी अभूतपूर्व असेल. काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाला या भागात डोकं वर काढायला जागा उरणार नाही. मराठवाड्यात भाजप हा मोठा भाऊ म्हणून समोर येईल. विकासाच्या मुद्द्यावर लोक भाजपच्या पाठीशी उभे राहिले आहेत, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
हरलेले लोक नेहमीच अशाच प्रकारची विधाने करतात
काँग्रेस हा आता देशातील तसेच राज्यातील सर्वात मागासलेला आणि माघारलेला पक्ष झाला आहे. त्यांनी जनतेचा कौल स्वीकारून आता आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. चुकीच्या धोरणांमुळेच काँग्रेसला ही परिस्थिती भोगावी लागत आहे. हरलेले लोक नेहमीच अशाच प्रकारची विधाने करतात. मानसिकतेतून पराभूत बाहेर येणे त्यांना कठीण जात आहे. वास्तवाचे भान नसलेले लोक अशा प्रकारची टीका करतात, पण जनता त्यांना निकालातून उत्तर देईल, अशा शब्दात काँग्रेसवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली.
जनता आम्हाला नक्कीच कौल देईल
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी डबल इंजिन सरकारची गरज आहे. महापालिका आणि नगरपालिकांच्या माध्यमातून शहरांचा कायापालट करण्याचे व्हिजन केवळ महायुतीकडेच आहे. हे व्हिजन पूर्ण करण्यासाठी जनता आम्हाला नक्कीच कौल देईल, असे बावनकुळेंनी म्हटले.
दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांचा बालेकिल्ला असलेल्या कामठी नगरपरिषदेकडे नागपूर जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे. कामठीतील जनतेने नेहमीच भाजपला भरभरून प्रेम दिले आहे. येथील विकासाचे व्हिजन पूर्ण करण्यासाठी जनता पुन्हा एकदा महायुतीच्या पाठीशी उभी राहिली आहे. कामठी आणि परिसरातील नगरपालिकांमध्ये विरोधकांचा सुपडा साफ होईल, अशा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
