Latur : लातूरमधील पत्रकार परिषदेत गोंधळ; छावा संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान लातूरमध्ये चांगलाच गोंधळ उडाला. अखिल भारतीय छावा संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद सुरू असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची मागणी करत पत्ते फेकून निषेध नोंदवला.
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विधानभवन हा शेतकऱ्यांचा कष्टाचा सभागृह असल्याचे सांगत, “माणिकराव कोकाटे यांनी घरी बसूनच रमी खेळावं,” अशी टीका केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छावा कार्यकर्त्यांवर बेदम मारहाण केली. पोलिसांनी मध्यस्थी करत हे भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला.
यावर उमटल्या राजकीय प्रतिक्रिया -
विद्या चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस - शरद गट) - “राजकारणात मतभेद असले तरी निवेदन देणाऱ्यांवर हल्ला करणे हे चुकीचं आहे. माणिकराव कोकाटे यांचं वर्तन शोभनीय नाही. शेतकऱ्यांप्रती तळमळ नसलेल्या आणि कोर्टाकडून शिक्षा झालेल्या मंत्र्याला पदावर ठेवणे योग्य नाही.”
राजू शेट्टी (स्वाभिमानी पक्ष) - “कृषीमंत्री म्हणून माणिकराव कोकाटे यांना तात्काळ हटवले पाहिजे. तसेच आज ज्यांनी छावा कार्यकर्त्यांवर हल्ला केला त्यांनाही त्यांच्या पदावरून हटवण्याची गरज आहे.”
सुषमा अंधारे (नेत्या, शिवसेना, उबाठा) - “आमच्या करदात्यांच्या पैशावर अधिवेशन सुरू असताना मंत्री असं वागत असतील तर हे निषेधार्ह आहे. मात्र मारहाण योग्य उत्तर नाही.”
एकनाथ खडसे (जेष्ठ नेते) - “अजित पवार शिस्तीचे नेते आहेत. मात्र बाहेरून आलेल्यांचा पक्षात भरणा वाढल्याने नियंत्रण सुटते आहे. त्यांनी शिस्तभंगाची कारवाई करावी.”
रोहिणी खडसे (राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी, शरद पवार गट) - “राज्यात गुंडशाही वाढते आहे का, असा प्रश्न निर्माण होतो आहे. निवेदन देणाऱ्यांवर हल्ला हा लोकशाहीचा अपमान आहे.”
सुरज चव्हाण (राष्ट्रवादी युवक काँग्रेस-अजित पवार गट) - “छावा संघटनेचे कार्यकर्ते कार्यक्रमात येऊन असंविधानिक भाषा वापरत होते. त्यांनी जर योग्य भाषेत संवाद साधला असता तर आम्हीही आदराने वागलो असतो.”
विजय घाडगे (प्रदेश अध्यक्ष, छावा संघटना) - “आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो. आमच्यावर हल्ला नाही, तर शेतकऱ्यांच्या लेकरांवर हल्ला झाला आहे. याचे उत्तर आम्ही देऊ.”
एकूणच ही संपूर्ण घटना राज्यातील राजकीय असंतोष आणि लोकशाही माध्यमांचा गैरवापर अधोरेखित करते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या घटनेची तातडीने याची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी आता सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.