Chhatrapati Sambhaji Raje : धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर छत्रपती संभाजी राजे म्हणाले की, " नुसता राजीनामा न घेता मुंडे यांची...

छत्रपती संभाजी राजे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मुंडे यांच्या निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप आहे. राजीनामा देऊन विषय संपत नाही, सरकारने सखोल तपास करावा, असे संभाजीराजे म्हणाले.
Published by :
Team Lokshahi

बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. संतोष देशमुखांना मारहाण करताना, त्यांची निर्घृण हत्या करतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ आता समोर आले आहेत. अनेक ठिकाणी या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत.

यातच आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनंजय मुंडे यांनी राजीनामा सोपवला असून मुख्यमंत्र्यांनी मुंडेंचा राजीनामा स्वीकारला आहे. याच पार्श्वभूमीवर आता छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, "धनंजय मुंडे यानी आज राजीनामा दिला आणि मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला आहे. अडीच महिन्यापुर्वी महाराष्ट्रामध्ये मी होतो की, धनंजय मुंडे यांचा राजनीमा घ्यावा. नुसता राजीनामा न घेता मुंडे यांची हकालपट्टी केली पाहिजे. अडीच महिन्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. पण राजीनामा देऊन विषय संपत नाही. सरकारने ज्या पद्धतीने एसआयटीच्या माध्यमातून आणि अनेक यंत्रणेच्या माध्यामातून असेल जो तपास केला आहे. त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन पोलिसांनी सखोल तपास करणं गरजेचे आहे. वाल्मिक कराड यांच्यापासून आणि कोण लोक त्याच्यामध्ये दडलेले आहेत. या क्रुर हत्याच्या माध्यामातून बीडमध्ये दहशत निर्माण केली आहे म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनाम्यावर चर्चा न करता सरकारपुढे काय करणार आहे. ज्या पद्धतीने क्रुर हत्या झालेली आहे. ते काल पिक्चर, व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले आहे. पुढे कसे जाणार यावरसुद्धा सविस्तर सरकारने सांगावे. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या, छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्राला न्याय मिळून द्यावा. लवकरात लवकर सगळे निर्णय घ्यावे अशी माझी सरकारला सूचना देत आहे."असे संभाजीराजे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com