Chhgan Bhujbal | मला कुणाचे फोन आले नाहीत, आले तरी सांगू शकणार नाही; भुजबळ यांची प्रतिक्रिया
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे राजकारणापासून दूर होते. कुटुंबासोबत ते परदेशात गेले होते. परदेशातून ते आता परत आले असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी छगन भुजबळ यांना नाराजीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत नेमकं काय चर्चा झाली? तसेच फडणवीस यांनी तुम्हाला मंत्रिपदाचा शब्द दिला आहे का? याबाबत विचारलं असता छगन भुजबळ म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी मला मंत्रिपदाबाबात कोणताही शब्द दिलेला नाही.”
छगन भुजबळ काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर छगन भुजबळ हे कुटुंबासह परदेशात गेले होते. आता ते परदेश दौऱ्यावरून नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना नाराजीसंदर्भात प्रश्न विचारला. परदेशात असताना तुमची राजकीय मनधरणी करण्यासाठी तुम्हाला कोणाचे फोन आले का? यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, “मला कोणाचेही फोन आले नाहीत आणि आले तरी मी तुम्हाला सांगणार नाही. मात्र, मी पूर्णपणे थोडे दिवस राजकारणातून डोकं बाजूला काढलं होतं. आयुष्यभर राजकारण करतच आहे. त्यामुळे थोड्यावेळ डोक्याला राजकीय आराम द्यावा लागतो”, असं छगन भुजबळांनी म्हटलं.
दरम्यान, छगन भुजबळ यांनी भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी म्हटलं होतं की, भुजबळ हे आमच्या महायुतीचे एक प्रमुख नेते आहेत. तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये त्यांच्या बद्दल सन्मानाची भावना आहे. स्वतः अजित पवार देखील त्यांची चिंता करतात. भुजबळांना अजित पवारांनी मंत्रिमंडळात घेतले नाही, त्यावेळी भुजबळांना डावलण्याचा त्यांचा हेतू नव्हता. अजित पवारांनी मला सांगितले की, आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष राहिलेला आहे. राष्ट्रीय स्तरावर आम्हाला आमचा पक्ष मोठा करायचा आहे. त्यामुळे भुजबळांसारखा एक नेता ज्यांना देशाच्या अन्य राज्यात देखील मान्यता आहे. त्यांना आम्हाला राष्ट्रीय पातळीवर पाठवायचे आहे. मात्र, भुजबळांचे मत वेगळे होते. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आम्ही सगळे मिळून यावर तोडगा काढू आणि भुजबळ यांच्यासारखा नेता आमच्यासोबत मैदानात असला पाहिजे, या दृष्टीने आम्ही मार्ग काढू, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.
राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होऊन आता एक महिना झाला आहे. मात्र, महायुतीच्या काही नेत्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यामुळे अद्यापही काही नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. छगन भुजबळ यांनाही मंत्रिमंडळात संधी मिळालेली नाही. त्यामुळे भुजबळांनी आपली नाराजी जाहीरपणे अनेकदा व्यक्त केली.