IND vs PAK Final : फायनलपूर्वी दोन संघात राडा! पाकिस्तानचं नवीन नाटक सुरु; आधी रेफरी आता थेट खेळाडूची तक्रार
थोडक्यात
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज (28 सप्टेंबर) आशिया कप 2025 ची अंतिम लढत खेळवली जाणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज (28 सप्टेंबर) आशिया कप 2025 ची अंतिम लढत खेळवली जाणार आहे.
21 सप्टेंबर रोजी झालेल्या सुपर-4 सामन्यात अर्शदीपने प्रेक्षकांकडे पाहून अश्लील हावभाव केले होते
Asia Cup Final Match India vs Pak : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज (28 सप्टेंबर) आशिया कप 2025 ची अंतिम लढत खेळवली जाणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीच वातावरण पुन्हा तापले असून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहविरोधात आयसीसीकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे.
पीसीबीच्या मते, 21 सप्टेंबर रोजी झालेल्या सुपर-4 सामन्यात अर्शदीपने प्रेक्षकांकडे पाहून अश्लील हावभाव केले होते. या कृतीतून आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन झाले असल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. त्याचबरोबर अर्शदीपवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या घटनेमुळे आजच्या अंतिम सामन्याआधी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याआधीही पाकिस्तानने भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यावेळी पीसीबीने सूर्यकुमारवर क्रिकेटचे राजकारण करण्याचा आणि आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन करण्याचा आरोप केला होता. दरम्यान, बीसीसीआयनेही हारिस रौफ आणि साहिबजादा फरहान यांच्याविरोधात आयसीसीकडे कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर आयसीसीने हारिस रौफवर मॅच फीच्या 30 टक्के दंडाची शिक्षा ठोठावली होती, तर साहिबजादाला इशारा देण्यात आला होता.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर-4 सामन्यात भारताने पाकिस्तानवर सहा विकेट्सने विजय मिळवला होता. त्या सामन्यात हारिस रौफ भारतीय फलंदाजांना सतत चिथवण्याचा प्रयत्न करत होता. इतकेच नव्हे तर फलंदाजीदरम्यान त्याने प्रेक्षकांकडे हाताने विमान पाडल्याची कृती केली होती. या कृतीला प्रत्युत्तर देताना अर्शदीपनेही सामन्यानंतर हावभाव केले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यावरूनच आता पाकिस्तानने नवी तक्रार दाखल केली आहे. आता आयसीसी या प्रकरणात काय निर्णय घेते आणि अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघावर त्याचा काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.