"शेतकरी नाही, विरोधी पक्ष कोमात गेलाय"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक घोषणा केल्या होत्या. परंतु, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं होतं. शेतकरी कोमात आहेत, कॉन्ट्रॅक्टर मित्र जोमात, असं उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले होते. परंतु, विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात भाषण करताना ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या पलटवार केलाय." हे सरकार शेतकऱ्यांचं आहे. शेतकऱ्यांना हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. विरोधकांनी शेतकऱ्यांना काय दिलं, याचा हिशोब मला माहिती आहे. मोदी गॅरेंटीवर सर्वांचा विश्वास आहे. शेतकऱ्यांना हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, असं म्हणत शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे.
शिंदे सभागृहात पुढे म्हणाले, या राज्यात कुठल्याही घटकाला आम्ही वंचित ठेवलं नाही. सरकार चांगलं काम करत असेल तर चांगल्याला चांगल म्हटलं पाहिजे. अर्थसंकल्प कसा वाचावा, कसा समजून घ्यावा याचं पुस्तक देवेंद्र फडणवीसांनी दिलंय. पुस्तक वाचल्याशिवाय प्रचिती येत नाही. सरकार चुकत असेल तर नक्की टीका करा. सरकारच्या चांगल्याला चांगलं म्हणण्याची दानत ठेवा. काही जण आमदारकी वाचवण्यासाठी साभागृहात हजेरी लावतात. विरोधकांकडे मुद्देच नाहीयत. टीका करताना विरोधकांची स्क्रिप्ट एकच असते. सकाळी आपल्यासोबत असलेला नेता दुपारी आपल्यासोबत राहील की नाही याची खात्री नाही. अजित पवार विकासाच्या मुद्द्यावर आमच्या सोबत आले.अर्थपूर्ण बोलण्यापेक्षा काही जण निरर्थक बोलतात.
राज्यात कल्याणकारी योजना आणल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी अनेक नव्या योजना आहेत. नवीन रेल्वे मार्गासाठी भूसंपादन करणार आहोत. स्वार्थासाठी विचार विकलेल्यांनी आरोप करु नये. सरकार चांगलं काम करतय तरी विरोधक टीका करतात. सरकारने चांगले निर्णय़ घेतले असं पटोले खासगीत सांगतात. एकाच स्क्रिप्टवरचे विरोधकांचे चित्रपट फ्लॉप होत आहेत. आम्ही शेतकऱ्यांना जे देतो, ते त्यांच्यापर्यंत पोहोचवतो, असंही शिंदे म्हणाले.

