India Agriculture 2025 : अमेरिकन टॅरिफचा फटका, तरीही भारताच्या कृषी क्षेत्राची दमदार कामगिरी

India Agriculture 2025 : अमेरिकन टॅरिफचा फटका, तरीही भारताच्या कृषी क्षेत्राची दमदार कामगिरी

अमेरिकेने लादलेल्या टॅरिफमुळे भारताच्या कृषी निर्यातीवर काही प्रमाणात परिणाम झाला असला, तरीही २०२५ मध्ये भारताच्या कृषी क्षेत्राने मजबूत आणि आशादायक कामगिरी केल्याचं चित्र समोर आलं आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

अमेरिकेने लादलेल्या टॅरिफमुळे भारताच्या कृषी निर्यातीवर काही प्रमाणात परिणाम झाला असला, तरीही २०२५ मध्ये भारताच्या कृषी क्षेत्राने मजबूत आणि आशादायक कामगिरी केल्याचं चित्र समोर आलं आहे. वर्षाच्या अखेरीस देशाने विक्रमी अन्नधान्य उत्पादनाची नोंद केली असून, हे उत्पादन गेल्या वर्षीच्या ३५७.७३ दशलक्ष टनांच्या तुलनेत अधिक असल्याचा अंदाज आहे. एकीकडे जागतिक बाजारपेठेतील अडथळे, तर दुसरीकडे देशांतर्गत सुधारणांमुळे कृषी क्षेत्राला नवे बळ मिळालं आहे.

वस्तू आणि सेवा कर (GST) दरांमध्ये करण्यात आलेल्या कपातीमुळे कच्च्या मालाच्या किमतीत मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी झाला असून कृषी उद्योगांनाही फायदा झाला आहे. मात्र अमेरिकन टॅरिफमुळे काही कृषी उत्पादनांच्या निर्यातीवर मर्यादा आल्या असून, त्यामुळे निर्यातदारांना नव्या बाजारपेठांचा शोध घ्यावा लागत आहे.

वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत कृषी सचिव देवेश चतुर्वेदी यांनी सांगितले की, “२०२५-२६ (जुलै–जून) या कालावधीत भारत विक्रमी अन्नधान्य उत्पादन साध्य करेल, असा आम्हाला विश्वास आहे.” यंदा खरीप हंगामातील उत्पादन सकारात्मक राहिले असून रब्बी पेरणीही समाधानकारक गतीने सुरू आहे. नैऋत्य मान्सूनने सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद केल्यामुळे खरीप पेरणीला मोठी चालना मिळाली.

आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी कृषी मंत्रालयाला १.३७ लाख कोटी रुपयांचा वाढीव अर्थसंकल्प मिळाला आहे. या माध्यमातून उच्च उत्पादकता, कमी उत्पादन खर्च, पीक विविधता, मूल्यवर्धन आणि थेट मदतीद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळ निर्णयांतर्गत पंतप्रधान पीक विमा योजना आणि हवामान-आधारित पीक विमा योजना २०२५-२६ पर्यंत वाढवण्यात आल्या असून, यासाठी ६९,५१६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच डीएपी खत अनुदान प्रति टन ३,५०० रुपयांनी वाढवण्यात आले आहे.

आकडेवारीनुसार, २०२५-२६ मध्ये खरीप अन्नधान्य उत्पादन विक्रमी १७३.३३ दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, जो २०२४-२५ मधील १६९.४ दशलक्ष टनांपेक्षा जास्त आहे. तांदळाचे उत्पादन १२४.५ दशलक्ष टनांहून अधिक होण्याची शक्यता असून, मक्याचे उत्पादन २८.३ दशलक्ष टनांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे काही भागांत पिकांचे नुकसान झाले असले, तरी एकूण उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम झालेला नाही.

१९ डिसेंबरपर्यंत रब्बी पेरणी ६५९.३९ लाख हेक्टरवर पोहोचली असून, ती गेल्या वर्षीच्या तुलनेत ८ लाख हेक्टरने अधिक आहे. गव्हाची पेरणीही ३००.३४ लाख हेक्टरवरून ३०१.६३ लाख हेक्टरपर्यंत वाढली आहे. एकूणच, जागतिक आव्हानांवर मात करत भारताचं कृषी क्षेत्र २०२५ मध्ये आशादायक आणि मजबूत वाटचाल करत असल्याचं स्पष्ट होत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com