Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

यवतमाळच्या सभेत देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, "राज ठाकरेही आता..."

"एकीकडे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएची महायुती आहे, तर दुसरीकडे राहुल गांधींची २६ पक्षांची इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी आहे"
Published by :

एकीकडे मोदींचे पावरफुल इंजिन आहे. या इंजिनसोबत आमचे डबे आहेत. आमच्यासोबत एकनाथ शिंदे, अजित पवार, रामदास आठवले आणि ज्यांच्याजवळ इंजिन होतं, ते राज ठाकरेही आता या इंजिनासोबत लागले आहेत. त्यामुळे एक मजबूत गाडी तयार केलीय. या गाडीत प्रत्येकाला बसायची जागा आहे. ही निवडणूक साधी निवडणूक नाही. ही ग्रामपंचायत निवडणूक नाही, जिल्हा परिषद नाही, विधान परिषद नाही, ही देशाचा नेता निवडण्याची लोकसभा निवडणूक आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएची महायुती आहे. तर दुसरीकडे राहुल गांधींची २६ पक्षांची इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी आहे, असं देवेंद्र फडणवीस यवतमाळच्या महायुतीच्या सभेत म्हणाले.

जनतेला संबोधित करताना फडणवीस म्हणाले, दहा वर्षात भारताला एक मजबूत अर्थव्यवस्था मोदींनी दिली. मला तिसऱ्यांदा पंतप्रधान केल्यावर मी जगातली तिसरी आणि मजबूत अर्थव्यवस्था तयार करेन, असं मोदींनी सांगितलं आहे. त्यानंतर मला एकाने विचारलं, अर्थव्यवस्था मोठी झाल्यावर मला काय फायदा आहे, मी सांगितलं, अर्थव्यवस्था मोठी झाल्यावर संधी निर्माण होतात. रोजगाराची निर्मिती होते. इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतं. गरिबाला घर मिळतं. रस्त्यांची बांधकामे होता. जगाच्या पाठिवर कोणताही देश आपल्याकडे वाकड्या नजरेनं पाहू शकत नाही. कल्याणकारी योजना तयार होतात. पाच वर्षांकरिता देशाचं भवितव्य कुणाच्या हातात द्यायचं यासाठी ही निवडणूक आहे.

फडणवीस पुढे म्हणाले, गोरगरिब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्यांकांसह सर्वांना बसायची जागा या मोदींच्या गाडीत आहे. मोदींचं भक्कम इंजिन सर्वांना घेऊन विकासाकडे चाललं आहे. दुसरीकडे २६ इंजिन आहेत. तिथे डब्बे नाही आहेत. इंजिनमध्ये एका व्यक्तीला बसायची जागा असते. फक्त ड्रायव्हर इंजिनमध्ये बसू शकतो. इतर कुणीही इंजिनमध्ये बसू शकत नाही. यांच्या इंजिनमध्ये समाजातल्या कोणत्याही व्यक्तीला बसायची जागा नाही. एकीकडे राहुल गांधी इंजिन दिल्लीकडे नेतात, स्टॅलिन तामिळनाडूत, उद्धव ठाकरे मुंबईकडे, ममता बॅनर्जी बंगालकडे, शरद पवार बारामतीकडे, लालू प्रसाद बिहारकडे नेतात. त्यामुळे यांचं इंजिन हालत नाही, डुलत नाही. त्यांचं इंजिन फेल झालं आहे.

मोदींनी भारताची अर्थव्यवस्था मजबूत करुन दाखवली. २०१३ मध्ये इंटरनॅशनल मॉनेटरी फंडने एक रिपोर्ट दिला. जगातले पाच देश दिवाळखोरी जाहीर करणार आहेत, असं सांगितलं. या पाच देशाची अर्थव्यवस्था कोलमडणार आहे. हे दिवाळखोर देश आहेत. दहा वर्षात मोदींनी अशी किमया केली, त्या आयएमएफने २०२३ ला एक रिपोर्ट प्रकाशित केला. त्या रिपोर्टमध्ये सांगितलं की, जगाच्या पाठीवर सर्वात विकसीत होणारी अर्थव्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्था आहे. सर्वात मजबूतीकडे चाललेली अर्थव्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्था आहे, असंही फडणवीस म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com