Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचं तपोवनातील वृक्षतोडीबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले
कुंभमेळ्यासाठी तपोवनातील झाडांची कत्तल करण्यावरुन सध्या नाशिकमध्ये राज्य सरकारविरोधात स्थानिकांनी मोठे आंदोलन उभे केले आहे. नाशिककर तपोवनातील झाडे वाचवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून आक्रमकपणे संघर्ष करत आहेत. राज्य सरकारने तपोवनातील झाडांची कत्तल (Tree cutting) न करता साधुग्रामी (Sadhugram) उभारणी करावी, अशी मागणी केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यासंदर्भात बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना भाष्य केले. या विषयावर राजकारण करणे योग्य नाही. आपली प्राचीन, सनातन परंपरा कुंभमेळा ही आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. (Nashik Tapovan Tree cutting)
तपोवनासंदर्भात आमचं मत हे की, झाडं कापणं योग्य नाही. कमीतकमी झाडं कापायला पाहिजेत. पण आपल्याला वास्तवही लक्षात घ्यावं लागेल. हा निर्णय महानगरपालिकने का घेतला, याचा विचार करावा. प्रयागराज येथे जो कुंभमेळा झाला तो 15 हजार हेक्टर जागेवर झाला. नाशिकमध्ये साधुग्रामची 350 एकर जागा आहे. नाशिक शहरात रामबन आणि साधुग्रामच्या बाजूला दुसरी कोणतीही जागा नाही. झाडांच्या दाटीमुळे आता सध्याच्या ठिकाणी साधुग्राम तयार करणे शक्य नाही. याशिवाय, गुगल इमेज 2015-16 मधील बघितल्या तर त्यामध्ये याठिकाणी एकही झाड दिसणार नाही. त्यावेळी राज्य सरकारने 50 कोटी वृक्षरोपणाचा जो कार्यक्रम हाती घेतला होता, त्या अंतर्गत महानगरपालिकेने ही झाडे लावली होती. पण इतक्या मोठ्याप्रमाणावर झाडे कापणे योग्य नाही. आम्ही यासंदर्भात विचार करत आहोत. काही मोठी झाडं काढून आम्ही रिलोकेट करणार आहोत. पण राजकारण या विषयावर होणे चूक आहे. आपली प्राचीन आणि सनातन परंपरा कुंभमेळा (Kumbhmela) ही आहे. कुंभमेळा हा आपला पर्यावरणाशी असलेला संबंध दृढ करणारा आहे. या कुंभमेळ्यासाठी आपण क्लीन गोदावरी ही मोहीम हाती घेणार आहोत. त्यामुळे तपोवनात विनाकारण वृक्षतोड होणार नाही. आवश्यक ती झाडं कापली जातील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
अजित पवार तपोवनातील वृक्षतोडीबाबत काय म्हणाले?
तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात समोपचारानं तोडगा काढला पाहिजे. पर्यावरण हिताची यासंदर्भात अभिनेते श्री. सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका आहे. पर्यावरणाचा समतोल विकासाबरोबर राखणं ही देखील काळाची गरज आहे. पर्यावरण वाचलं तरच पुढची पिढी सुरक्षित राहीलं, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे, असे अजित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे
