"राहुल गांधींची गाडी पुढे जात नाही, पण मोदींचं इंजिन पावरफुल"; फडणवीसांचा 'इंडिया' आघाडीवर घणाघात
मोदींचं इंजिन पावरफुल आहे. सर्वांना सोबत घेऊन विकासाच्या दिशेनं आमची गाडी चालत आहे. राहुल गांधीच्या गाडीत फक्त इंजिन आहे. त्यांच्या गाडीत डबे नाहीत. राहुल गांधी म्हणतात, मी इंजिन आहे. शरद पवार म्हणतात, मी इंजिन आहे. उद्धव ठाकरे म्हणतात, मी इंजिन आहे. ममता बॅनर्जी आणि लालू प्रसाद यादव म्हणतात, मी इंजिन आहे. स्टॅलिनपण म्हणतात, मी इंजिन आहे. प्रत्येक जण म्हणतो, मी इंजिन आहे. इंजिनमध्ये फक्त ड्रायव्हरला बसायची जागा असते. समाजातला कुणालाही इंजिनमध्ये बसता येत नाही. यांचं इंजिन हालत नाही, डुलत नाही. राहुल गांधींची पुढे न जाणारी गाडी तयार झाली, पण मोदींच्या गाडीत सर्वांना जागा आहे. प्रत्येकाला विकासाच्या गाडीत बसायचं असेल, तर मोदींच्या गाडीत जागा आहे, असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीचा समाचार घेतला. ते गडचिरोली येथे अशोक नेते यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
२५ कोटी लोक गरिबी रेषेखाली होते, त्यांच्या जीवनात दहा वर्षात परिवर्तन केलं. दहा वर्षात २० कोटी लोक झोपडीत राहायचे. कच्चा घरात राहायचे. अशा लोकांना मोदींनी पक्क घर दिलं. ५० कोटी लोकांच्या घरात पिण्याचं पाणी नव्हतं. माता भगिनींना हंडा घेऊन विहिरीवर किंवा नदीवर जावं लागत होतं. त्या ५० कोटी घरांमध्ये नळाच्या माध्यमातून पिण्याचं शुद्ध पाणी देण्याचं काम मोदींनी दिलं, असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने उधळली. ते भाजपच्या 'अब की बार ४०० पार' प्रचारसभेत भिसी येथे बोलत होते.
५५ कोटी लोकांना आयुष्यमान भारताच्या माध्यमातून काम दिलं. ५ लाखांपर्यंत सर्व उपचार मोफत करण्याचा निर्णय घेतला. आज मला हजारो लोक म्हणतात मोदींना आशीर्वाद द्यायचं आहे. लोक म्हणतात, मोदींनी आमच्या आरोग्यासाठी पैसा खर्च केला, म्हणून आम्ही जिवंत आहोत.२०२६ नंतर विधानसभेत आणि लोकसभेतही महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचं काम मोदींनी केलं. आबोसी समाज, बाराबलुतेदारांकरिता २० हजार कोटींची योजना मोदींनी दिली. मोदींनी आदिवासी समाजासाठी २२ हजार कोटी रुपयांची योजना आणली, असंही फडणवीस म्हणाले.