Satara Rain Update : साताऱ्यात पूरस्थिती गंभीर! कृष्णा-कोयना नद्या ओसंडून वाहिल्या, 350 नागरिकांचे स्थलांतर

Satara Rain Update : साताऱ्यात पूरस्थिती गंभीर! कृष्णा-कोयना नद्या ओसंडून वाहिल्या, 350 नागरिकांचे स्थलांतर

सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे घाटमाथ्यावरील धरणे जलदगतीने भरू लागली आहेत.
Published by :
Prachi Nate
Published on

सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे घाटमाथ्यावरील धरणे जलदगतीने भरू लागली असून कोयना, कृष्णा, वेण्णा आणि उरमोडी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. परिणामी सातारा, पाटण, महाबळेश्वर आणि वाई तालुक्यातील 350 हून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

कोयना धरण शंभर टक्क्यांपेक्षा जास्त क्षमतेने भरले असून सर्व दरवाजे उघडून मोठ्या प्रमाणावर विसर्ग केला जात आहे. धरणातून जवळपास एक लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कण्हेर, उरमोडी, धोम आणि वीर धरणांतूनही मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्याने नदीकाठचे अनेक भाग धोक्याच्या स्थितीत आले आहेत. काही पूल आणि बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

पाटण तालुक्यातील काही गावे पूर्णपणे जलमय झाली असून दोनशेहून अधिक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. कराड–चिपळूण मार्गावर वाहतूक थांबवावी लागली आहे. कराडमधील प्रीतीसंगम परिसरात कृष्णामाई मंदिर परिसरात पाणी शिरले आहे. पुढील 24 तासांत पावसाचा जोर कायम राहिल्यास साताऱ्यासोबतच कराड आणि सांगली परिसराला महापुराचा धोका असल्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठच्या गावांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सातारा आणि सांगली जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापन पथकांसह सज्ज असून नागरिकांना नदीकिनारी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com