Mumbai News : दहीहंडीआधीच दहीसरमध्ये सणाला गालबोट! सरावादरम्यान थरावरुन कोसळून 11 वर्षीय गोविंदाचा मृत्यू
दहीहंडी उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असताना राज्यभरात गोविंदा पथकांचा सराव जोरात सुरू आहे. “बोल बजरंगबली की जय” च्या घोषणांनी गजबजलेल्या मैदानांमध्ये मुलं-मुलींची उत्साहपूर्ण तयारी सुरू असताना, दहिसरमध्ये मात्र एका धक्कादायक घटनेने सर्वांना हादरवून सोडले आहे. सरावादरम्यान अकरा वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून, त्यामुळे दहीहंडी पथकांच्या सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत.
ही घटना दहिसरच्या केतकीपाडा परिसरात घडली. महेश रमेश जाधव हा ११ वर्षीय बाल गोविंदा आपल्या पथकासोबत सराव करत असताना तोल जाऊन खाली पडला. पडल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली आणि उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, लहान वयाच्या मुलांना अशा जोखमीच्या सरावात सामील करण्याबाबत तीव्र चर्चा सुरू झाली आहे.
दहीहंडीच्या सराव व स्पर्धांदरम्यान अपघातांची शक्यता नेहमीच अधोरेखित केली जाते. पाय घसरून किंवा तोल जाऊन पडल्यामुळे दरवर्षी अनेकांना किरकोळ तसेच गंभीर दुखापती होतात. सरकारने गोविंदांसाठी विमा संरक्षण जाहीर केले असले तरी प्रत्यक्ष सरावावेळी मूलभूत सुरक्षा साधनांचा अभाव असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, गादी किंवा मऊ जमिनीवर सरावाची व्यवस्था अशा गोष्टींचा वापर अनेक पथके करत नाहीत. याशिवाय योग्य प्रशिक्षकांची देखरेख नसणेही अशा दुर्घटनांचे एक मोठे कारण मानले जाते.
महेशच्या मृत्यूनंतर नागरिक आणि सामाजिक संघटनांनी दहीहंडी सराव व स्पर्धांसाठी कठोर सुरक्षा नियमावली तयार करण्याची आणि तिचे काटेकोर पालन करण्याची मागणी केली आहे. “उत्सव हा आनंदाचा असतो, परंतु त्यात सहभागी होणाऱ्या लहानग्यांचा जीव धोक्यात जाणार नाही, याची जबाबदारी आयोजक आणि प्रशासनाने घेतली पाहिजे,” असे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.
दहीहंडी उत्सव काही दिवसांवर असताना ही घटना संपूर्ण मुंबईत आणि राज्यभरात चिंता वाढवणारी ठरत आहे. सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्यास, आनंदाचा हा सण जीवघेणा ठरू शकतो, याची जाणीव या घटनेने पुन्हा एकदा करून दिली आहे.