Farmers Day : राज्यात 30 ऑगस्ट हा दिवस 'शेतकरी दिन' म्हणून साजरा होणार
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याचं स्मरण व्हावं आणि राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा म्हणून 30 ऑगस्ट, 2023 या नारळी पौर्णिमेच्या दिवशी त्यांचा जन्म दिवस शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
विखे पाटलांनी प्रवरानगरचा साखर कारखाना हा आशिया खंडातील सहकारी तत्त्वावर चालणारा अग्रगण्य कारखाना म्हणून ओळखला गेला. विखे पाटील यांनी सहकार, कृषी, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल 1961 मध्ये भारत सरकारने त्यांना 'पद्मश्री' हा पुरस्कार देऊन सन्मान केला होता. डॉ विठ्ठलराव विखे पाटील हे सहकार क्षेत्रातील एक मोठं नाव होतं.
अहमदनगर जिल्ह्यात रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळा व महाविद्यालये यांची स्थापना केली. सहकारी तत्त्वावरील पहिला साखर कारखाना विखे-पाटील यांच्याच नेतृत्वाखाली उभा राहिला. 1923 मध्ये 'लोणी-बुद्रुक सहकारी पतपेढी' स्थापन केली. त्यांनी गावोगावी सहकारी पतपेढ्या स्थापन केल्या व त्यांच्या माध्यमातून शेतकर्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून दिली.