Manoj Jarange Maratha Protest : सरकारने मान्य केल्या मागण्या, आंदोलकांची रात्री 9 वाजेपर्यंत मुंबई सोडण्याची तयारी
Manoj Jarange Maratha Protest : आझाद मैदानावर पाच दिवसांपासून सुरू असलेलं मराठा आरक्षण आंदोलन अखेर यशस्वी ठरलं आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनानंतर राज्य सरकारने त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत. यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली. सोमवारी संध्याकाळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी उपोषणस्थळी दाखल झाले. चर्चेनंतर जरांगेंनी समाजाला सविस्तर माहिती दिली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “सरकार अंमलबजावणी आणि जीआर देईल, तर रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली होईल. आंदोलक नाचत नाचत गावाकडे जातील. आम्ही स्वागताला तयार आहोत, तुम्ही जीआर द्या.”
यावेळी जरांगेंनी आठ मागण्यांबाबतचा अहवालही मांडला. “एकदा सरकारनं अंमलबजावणी सुरू केली की हे आंदोलन संपलं, आंदोलक परतले. आम्ही कुणाच्या दबावाखाली नाही, समाजाच्या ताकदीवर लढतोय,” असे ते म्हणाले. यानंतर त्यांनी उपस्थित आंदोलकांना विचारलं “सरकारला हा म्हणू का?” यावर आंदोलकांनी एकमुखाने होकार देत जयघोष केला. भावनिक होत जरांगेंनी म्हणाले, “ओके जिंकलो रे राजे हो आपण! आज कळालं, गरीबांची ताकद किती मोठी आहे.”
सरकारसोबतच्या चर्चेतून आलेल्या या निकालानंतर आझाद मैदानावरील मराठा समाजाचं आंदोलन संपुष्टात आलं असून, रात्री ९ वाजेपर्यंत सर्व आंदोलक मुंबई सोडून आपल्या गावी परत जाणार आहेत.