For the development of Konkan, the central government is finally giving impetus to the Kolhapur-Vaibhavwadi railway line and this project will soon become a reality.
For the development of Konkan, the central government is finally giving impetus to the Kolhapur-Vaibhavwadi railway line and this project will soon become a reality.

Nitesh Rane : कोकणवासियांसाठी मोठी आनंदवार्ता! या मार्गिकेला अखेर गती; नितेश राणेंची मोठी घोषणा

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कोल्हापूर–वैभववाडी रेल्वेमार्गाला अखेर गती मिळणार असून हा प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे, अशी माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.
Published by :
Riddhi Vanne
Published on

कोकणच्या विकासासाठी केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याने कोकणवासियांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कोल्हापूर–वैभववाडी रेल्वेमार्गाला अखेर गती मिळणार असून हा प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे, अशी माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.

कणकवली येथील ‘ओम गणेश’ निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री राणेंनी सांगितले की, ६ हजार ५०० कोटी रुपये खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकार ५०-५० टक्के खर्च उचलणार आहेत. यासाठी अर्थसंकल्पात ३ हजार २४४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

२०२८ पर्यंत रेल्वेमार्ग पूर्ण होणार

कोल्हापूर–वैभववाडी रेल्वेमार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला १ फेब्रुवारीपासून सुरुवात करण्याचे नियोजन असून २०२८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. हा रेल्वेमार्ग कोकणाला थेट पश्चिम महाराष्ट्राशी जोडणार असून, त्यामुळे व्यापार, उद्योग आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.

या रेल्वेमार्गामुळे विजयदुर्ग आणि देवगड बंदरांच्या विकासालाही गती मिळेल, असे मंत्री राणे म्हणाले. याचा थेट फायदा कोकणातील तरुणांना होणार असून रोजगारासाठी बाहेर गेलेले अनेक युवक पुन्हा आपल्या गावाकडे परततील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘डबल इंजिन’ सरकारमुळे कोकणच्या विकासाला बळ

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील ‘डबल इंजिन’ सरकारमुळेच कोकणच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला आहे, असे नितेश राणे यांनी स्पष्ट केले.

मच्छिमारांसाठी मोठे निर्णय

कोकणच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या मत्स्य व्यवसायासाठीही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

५०० नवीन तलावांची निर्मिती

  • खोल समुद्रातील मासेमारी करमुक्त

  • किनारपट्टीवरील मच्छिमारांसाठी गटनिर्मिती

  • या निर्णयांमुळे मच्छिमारांच्या आर्थिक परिस्थितीत लक्षणीय सुधारणा होणार असल्याचे मंत्री राणे म्हणाले.

बागायतदारांना दिलासा, फळ उत्पादनाला चालना

कोकणातील बागायतदारांसाठीही आनंदाची बातमी आहे. नारळ संवर्धन योजनेच्या माध्यमातून फळ उत्पादनाला नवी दिशा देण्यात येणार असून बागायतदारांचे दरडोई उत्पन्न वाढवण्यावर सरकारचा भर राहणार आहे.

पर्यटनासाठी जालवाहतूक व सी-प्लेन प्रकल्प

पर्यटनवाढीच्या दृष्टीने जलवाहतूक व्यवस्था मजबूत करण्याबरोबरच सी-प्लेन सेवेसाठीही अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. यामुळे कोकण पर्यटनाच्या नकाशावर अधिक ठळकपणे झळकणार आहे.

रेडिओ क्लब जेट्टीच्या कामाला वेग देण्याचे निर्देश

दरम्यान, बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबजवळील जेट्टीचे काम ठरलेल्या कालमर्यादेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. मंत्रालयात आयोजित बैठकीत त्यांनी जेट्टीचे काम लवकर पूर्ण करून नागरिकांसाठी वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यावर भर दिला.

एकूणच, कोल्हापूर वैभववाडी रेल्वेमार्गासह मत्स्यव्यवसाय, बागायतदारी आणि पर्यटन क्षेत्रातील निर्णयांमुळे कोकणच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com