Saamana : बाळासाहेब ठाकरे नसते व त्यांनी शिवसेना जन्मास घातली नसती तर काय झाले असते?
बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. या निमित्त 'सामना'च्या अग्रलेखातून म्हटले आहे की, भाजपास डोक्यावर नेण्याचे औदार्य ज्या बाळासाहेबांनी दाखवले त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेवर घाव घालणाऱ्यांच्या पायाशी शिवसेनेतलेच बेइमान बसलेले दिसतात तेव्हा शिवरायांशी बेइमानी करणाऱ्या इतिहासातील अवलादीची आठवण येते. महाराष्ट्राची धुळीस मिळालेली प्रतिष्ठा, मराठी माणसाचा गहाण पडलेला स्वाभिमान, कष्टकऱ्यांची उडालेली धूळधाण सावरून पुन्हा नवा महाराष्ट्र उभा करणे हीच हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना खरी आदरांजली ठरेल. नाहीतर 'उडाले शब्दांचे बुडबुडे' असेच घडेल. चला मग, उचला तो बेलभंडारा आणि लागा स्वाभिमानी महाराष्ट्र घडवण्याच्या कामाला!
महाराष्ट्राने निरंतर अभिमान बाळगावा असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व होते. ते फक्त नावाचे नव्हे तर कृतीने हिंदुहृदयसम्राट होते. त्यामुळे त्यांच्या कीर्तीचे चौघडे भारतात आणि भारताबाहेर वाजत होते. भारताच्या इतिहासात महात्मा गांधी, नेहरू, वीर सावरकर, लोहिया, टिळक, श्रीपाद अमृत डांगे आणि जगाच्या इतिहासात सिसरो, बर्क, शेरिडन असे वक्तृत्व कलेचे नामांकित कंठमणी होऊन गेले. त्याच मालिकेतले 'ठाकरे' हे एक तेजस्वी मणी होत. सामान्य, पण महाराष्ट्रभक्त कुटुंबात ते जन्मले आणि आयुष्यभर सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी ते झगडत राहिले.
बाळ गंगाधर टिळक व बाळ केशव ठाकरे यांना देशात मिळालेली लोकमान्यता थक्क करणारी आहे. सुरुवातीला मराठीची आघाडी बाळासाहेबांनी झुंजविली. त्यासाठी कुंचला, वाणी व लेखणीचा वापर त्यांनी हत्यार म्हणून केला. बाळासाहेबांची महाराष्ट्राला सर्वात मोठी देणगी म्हणजे त्यांनी छत्रपती शिवरायांनंतर मराठी माणसाला अन्यायाविरुद्ध लढायला प्रवृत्त केले. मराठी स्वाभिमानाची मशाल पेटवली. पाच वर्षांच्या संघर्षानंतर मुंबईसह महाराष्ट्र मिळाल्यावरही अन्यायाच्या लाथा खात मराठी माणूस थंड लोळागोळा होऊन पडला होता. त्याच्या मनात असंतोषाची ठिणगी टाकून भडका उडवण्याचे काम बाळासाहेबांनी केले. छत्रपती शिवरायांविषयी कवी कुलभूषण लिहितो,
काशी की कला जाती
मथुरा की मस्जिद होती
अगर शिवाजी न होते
तो सुन्नत सबकी होती
बाळासाहेब ठाकरे नसते व त्यांनी शिवसेना जन्मास घातली नसती तर काय झाले असते?
महाराष्ट्राचे दिल्लीच्या वाटेवरील
पायपुसणे झाले असते,
मराठी माणूस लाचार आणि
हतबल झाला असता,
महाराष्ट्र हा शिवरायांचे
मराठी राष्ट्र राहिले नसते
आणि महाराष्ट्राच्या शौर्याची
आणि मर्दानगीची ‘सुंता’ झाली असती…
हे सर्व थांबवले ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेल्या शिवसेनारूपी कवचकुंडलांनी, पण महाराष्ट्राची आजची अवस्था स्वाभिमानाची ‘सुंता’ झाल्यासारखीच दिसत आहे. असे सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे.