Holi Special Train : होळी विशेष: मध्य रेल्वेच्या 209 अतिरिक्त गाड्या; प्रवाशांना मोठा दिलासा
होळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई, नागपूर, रत्नागिरी, चिपळूणसह विविध मार्गांवर तब्बल 209 होळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. दरवर्षी होळीच्या काळात मोठ्या प्रमाणावर नागरिक आपल्या मूळ गावी परतत असल्याने नियमित गाड्यांवर ताण वाढतो. यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी या अतिरिक्त गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे.
भारतीय रेल्वेने यंदा देशभरात एकूण 1410 होळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याची योजना आखली आहे. त्यामध्ये मध्य रेल्वेचा मोठा वाटा असून मुंबई-नागपूर-मुंबई, मुंबई-रत्नागिरी-मुंबई, मुंबई-चिपळूण-मुंबई तसेच अन्य महत्त्वाच्या मार्गांवर या गाड्या धावणार आहेत. या विशेष गाड्यांमध्ये वातानुकुलित (AC) कोच, एसीसह शयनयान (स्लीपर) सुविधा आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील. तसेच अल्प अंतराच्या प्रवाशांसाठी अनारक्षित विशेष गाड्याही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व उत्पन्न गटातील प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
विशेषतः मुंबई ते नागपूर, कोल्हापूर, सावंतवाडी रोड आणि पुणे ते नागपूर दरम्यान 24 स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाड्यांमुळे विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
एलटीटी-नागपूर सुपरफास्ट स्पेशल
लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते नागपूर दरम्यान 01021 सुपरफास्ट स्पेशल 14 आणि 21 फेब्रुवारी रोजी एलटीटीहून रात्री 12.55 वाजता सुटून दुपारी 3.45 वाजता नागपूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी 01022 सुपरफास्ट स्पेशल 14 आणि 21 फेब्रुवारी रोजी नागपूरहून रात्री 8 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री 11.45 वाजता एलटीटी येथे येईल.
या गाडीला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. (01022 साठी इगतपुरी येथे थांबा असेल.) रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना वेळापत्रक व आरक्षणाची माहिती अधिकृत संकेतस्थळावर तपासण्याचे आवाहन केले आहे. होळीच्या काळात सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी प्रवास व्हावा हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
