Holiday for schools in Palghar District : पालघर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा निर्णय
थोडक्यात
महाराष्ट्रभर पावसाचा जोर वाढत असून अनेक भागांमध्ये नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत
मराठवाड्यापासून ते कोकणपर्यंत मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे.
पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना सोमवार, 29 सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर
Holiday for schools in Palghar District : सध्या महाराष्ट्रभर पावसाचा जोर वाढत असून अनेक भागांमध्ये नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मराठवाड्यापासून ते कोकणपर्यंत मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. खरीप हंगाम पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर, पुढील दोन दिवसांत पावसाची तीव्रता आणखी वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन पालघर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना सोमवार, 29 सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सलग पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले असून, पूल व वाहतुकीचे मार्ग अडथळ्यांत आले आहेत. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येऊ नये, शाळेत जाताना अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पालघर जिल्ह्यात रविवारी आणि सोमवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, फक्त गरज असल्यासच बाहेर पडावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नदी, नाले आणि तलाव धोक्याच्या पातळीवर आले असून, पावसाचा जोर वाढल्यास पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, राज्यातील इतर जिल्ह्यांनाही हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक आणि पालघर या जिल्ह्यांना उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नंदूरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. सध्या प्रशासन युद्धपातळीवर खबरदारी घेत असून, नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे, पाण्याच्या प्रवाहात धाडसाने उतरणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे.