Mohan Bhagwat :  'संघ सांगेल तेव्हा निवृत्ती घेणार..', मोहन भागवत यांचं वक्तव्य..

Mohan Bhagwat : 'संघ सांगेल तेव्हा निवृत्ती घेणार..', मोहन भागवत यांचं वक्तव्य..

मोहन भागवत यांनी आपल्या निवृत्तीविषयी स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली आहे. “संघ सांगेल तेव्हाच निवृत्ती घेईन, पण निवृत्तीनंतरही संघाचे कार्य सुरूच ठेवेन,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या निवृत्तीविषयी स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली आहे. “संघ सांगेल तेव्हाच निवृत्ती घेईन, पण निवृत्तीनंतरही संघाचे कार्य सुरूच ठेवेन,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. वय, पद किंवा जबाबदारी यापेक्षा संघकार्य महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत म्हणाले की, “मी आता ७५ वर्षांचा झालो आहे. त्यामुळे थांबायला हवे असे मला स्वतःला वाटले होते. पण संघातील कार्यकर्ते मला म्हणतात, अडचण काय आहे? तुम्ही अजूनही चालता-फिरता आहात, काम करू शकता.” कार्यकर्त्यांचा हा विश्वास आणि आग्रहच आपल्याला पुढे काम करण्याची प्रेरणा देतो, असेही त्यांनी सांगितले.

मोहन भागवत यांनी यावेळी सरसंघचालक पदाविषयी समाजात असलेल्या गैरसमजांवरही स्पष्ट भाष्य केले. “सरसंघचालक हा कोणत्याही जातीचा नसतो. तो केवळ हिंदू असतो,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. सरसंघचालक ब्राह्मण, एससी, एसटी किंवा अन्य कोणत्याही जातीच्या चौकटीत बसवणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संघामध्ये पदे ही जात, वर्ग किंवा वंशावर नव्हे तर कार्य, संस्कार आणि समर्पणावर दिली जातात, असे त्यांनी सांगितले. “सरसंघचालक ब्राह्मण असतो किंवा एससी-एसटी असतो, असा प्रश्नच उद्भवत नाही. संघामध्ये व्यक्तीची ओळख त्याच्या कार्यावरून होते,” असे भागवत म्हणाले. संघ सर्वसमावेशक असून प्रत्येक हिंदूला समान संधी देणारा असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. समाजात पसरवले जाणारे जातीय भेदाचे कथानक संघाच्या तत्त्वज्ञानाशी विसंगत असल्याचेही त्यांनी सूचित केले.

निवृत्तीबाबत बोलताना भागवत म्हणाले की, संघात निवृत्ती म्हणजे काम थांबवणे नसते. “पदावरून निवृत्ती घेतली तरी कार्य सुरूच राहते. संघ हे आयुष्यभराचे कार्य आहे,” असे ते म्हणाले. संघामध्ये कोणीही ‘माजी’ होत नाही, तर जबाबदाऱ्या बदलतात, एवढेच, असा महत्त्वाचा विचार त्यांनी मांडला. संघाच्या कार्यपद्धतीवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, संघामध्ये नियुक्त्या केल्या जात नाहीत, तर कार्यकर्ते घडवले जातात. संस्कार, शिस्त आणि राष्ट्रभक्ती यांच्या आधारे व्यक्ती घडत जाते आणि त्या प्रवासात जबाबदाऱ्या आपोआप येतात. मोहन भागवत यांच्या या वक्तव्यामुळे संघाच्या नेतृत्वाबाबत आणि निवृत्तीच्या चर्चांवर स्पष्टता आली असून, संघाची भूमिका जातीपलीकडे आणि व्यक्तीपलीकडे असल्याचा संदेश पुन्हा एकदा ठळकपणे पुढे आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com