Gulab Raghunath Patil

Gulabrao Patil : “सन्मानाने युती झाली तर ठीक, नाहीतर...",गुलाबराव पाटीलांचे स्पष्ट वक्तव्य

राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा आपला ठाम आणि बेधडक स्वभाव समोर आणत युतीबाबत स्पष्ट भूमिका मांडली.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा आपला ठाम आणि बेधडक स्वभाव समोर आणत युतीबाबत स्पष्ट भूमिका मांडली. “सन्मानाने युती झाली तर ठीक; नाही तर आम्ही आमच्या ताकदीवर लढायला तयार आहोत,” अशा शब्दांत त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिलेला संदेश राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देतानाच त्यांनी आपल्या कार्यपद्धतीचीही पुनरुज्जीवित आठवण करून दिली. “कार्यकर्त्यांचा असो किंवा सर्वसामान्यांचा असो, पहिल्याच बेलमध्ये फोन उचलला नाही तर मी गुलाबराव पाटील नाही,” असे म्हणत त्यांनी जनतेसाठी 24 तास उपलब्ध असल्याचे सांगितले. “समस्या सोडवण्यासाठी आमचं दुकान 24 तास चालू असतं,” असेही त्यांनी नमूद केले.

एकनाथ शिंदे यांच्याबाबत बोलताना पाटील म्हणाले, “मी एकनाथ शिंदे यांचा चेला आहे. नायक पिक्चरमध्ये अनिल कपूरने एका दिवसाच्या मुख्यमंत्र्याची भूमिका केली, तशीच भूमिका वास्तवात एकनाथ शिंदेंनी निभावली. मुख्यमंत्री काय असतो हे त्यांनी दाखवून दिलं.” राजकीय टीकेकडे वळताना त्यांच्या वक्तव्यातील टोचणी ठळकपणे जाणवली. “आम्ही गुवाहाटीला गेलो तेव्हा खूप टीका झाली. ५० खोके, एकदम ओके — अजूनही त्या टीकेने कान खणखणतात. ‘गद्दार’ म्हणलं, पण आम्ही भगव्याच्या छताखाली ते ऐकून घेतलं,” असे ते म्हणाले.

त्यांनी सामाजिक प्रतिमांसंदर्भात बोलताना रोखठोक भूमिका मांडली. “रावण अजूनही जिवंत आहे. रावण जिवंत राहिला पाहिजे नाहीतर रामायण संपेल. कलियुगातले रावण अजूनही जिवंत आहेत. त्यांचा नाश करण्यासाठी आपल्याला विकास करायचा आहे,” असे विधान करत त्यांनी विकासकार्यास प्राधान्य देण्याचे सूचित केले.

सरकारी योजनांवर बोलताना पाटील म्हणाले, “आनंदाचा शिधा सुरू झाला तो शिंदे सरकारच्या काळात. पण आता तो बंद होत चालल्याची खंत वाटते,” असे म्हणत त्यांनी प्रशासनावरही अप्रत्यक्ष टीका केली. युतीबाबत पुन्हा भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितले, “युती होईल किंवा नाही याची पर्वा करू नका. सन्मानाने युती होत असेल तर ठीक; नाहीतर आम्ही आमच्या ताकदीने लढायला तयार आहोत.” त्यांच्या या विधानामुळे आगामी राजकीय समीकरणांबाबत तर्क-वितर्कांना पुन्हा उधाण येण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com