Nanded News : लोकशाही मराठीचा इम्पॅक्ट , बनचिंचोली शाळा प्रकरणी विद्यार्थ्यांसाठी पर्यायी जागेचा ठराव
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील बनचिंचोली येथे जिल्हा परिषद शाळेचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. 1960 साली उभारण्यात आलेली ही शाळा आता न्यायालयाच्या आदेशानंतर मूळ जमीनमालकाच्या ताब्यात देण्यात आली आहे. त्यामुळे पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या 129 विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. भूसंपादन न करता बांधलेली शाळा न्यायालयाने मूळ मालकाच्या स्वाधीन केली आहे. यानंतर विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जात आहे, ग्रामपंचायतच्या अधिकारातील शासकीय जागा बाबत ठराव घेण्यात आला असून विद्यार्थ्यांसाठी ती जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं शिक्षण विस्तार अधिकारी गुणवंत काळे यांनी सांगितलं आहे.
#NandedNews #Hadgaon #BanChincholi #ZPSchool #EducationCrisis #RuralEducation #MaharashtraNews #StudentRights #BreakingNews
सदर शाळेची इमारत ज्या जागेवर उभारण्यात आली होती, ती जमीन प्रत्यक्षात शेतकरी देवराव पौळ यांच्या मालकीची असल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. जिल्हा परिषदेकडून कोणताही मावेजा किंवा भूसंपादन प्रक्रिया न करता शाळा बांधण्यात आल्याचा दावा न्यायालयाने ग्राह्य धरला. अखेर 6 गुंठे जागा देवराव पौळ यांच्या मालकीची असल्याचा निकाल देत न्यायालयाने ती जागा त्यांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले.
या निर्णयानंतर शाळेची इमारत रिकामी करण्यात आली असून विद्यार्थ्यांना तात्पुरत्या स्वरूपात अंगणवाडीच्या दोन खोल्यांमध्ये वर्ग भरवले जात आहेत. मात्र या ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. शौचालयाची सोय नसल्यामुळे मुलींसह सर्व विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. मध्यान्ह भोजनासाठी दिली जाणारी खिचडी उघड्यावर शिजवली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
गावकऱ्यांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “आमची शाळा आम्हाला द्या” अशी आर्त हाक विद्यार्थी आणि पालक देत आहेत. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या शाळेच्या प्रश्नाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
दरम्यान, या प्रकरणी विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचे शिक्षण विस्तार अधिकारी गुणवंत काळे यांनी स्पष्ट केले आहे. ग्रामपंचायतीच्या अधिकारातील शासकीय जागेबाबत ठराव घेण्यात आला असून विद्यार्थ्यांसाठी ती जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच पर्यायी जागेवर शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
शेतकरी देवराव पौळ यांनी देखील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, योग्य तो मावेजा दिल्यास ते ही जागा परत देण्यास तयार आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने तोडगा काढून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बनचिंचोलीतील या घटनेमुळे ग्रामीण भागातील शैक्षणिक व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा अधोरेखित झाल्या आहेत. भूसंपादनासारख्या कायदेशीर प्रक्रियेचे पालन न केल्याने विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचे चित्र समोर आले आहे. आता प्रशासनाने तातडीने निर्णय घेत विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सुसज्ज शाळा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
