सामूहिक लग्न सोहळ्यात अन्नातून 600 लोकांना विषबाधा; 17 गंभीर, तर 7 वर्षाच्या मुलाने गमावला जीव

कन्नड तालुक्यातील अंबाळा-ठाकूरवाडी येथे पार पडलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यानंतर विषबाधेने थैमान घातले.
Published by :
Team Lokshahi

साजऱ्या होत असलेल्या आनंदोत्सवाचे दुःखात रूपांतर व्हावे, अशी हृदयद्रावक घटना कन्नड तालुक्यातील अंबाळा-ठाकूरवाडी येथे घडली. अंबाळा-ठाकूरवाडी येथे पार पडलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यानंतर विषबाधेने थैमान घातले. सुमारे 600 वऱ्हाड्यांचे आरोग्य ढासळले असून, एका 7 वर्षीय निष्पाप बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना संपूर्ण परिसराला हादरवून गेली आहे.

शुक्रवारी अंबाळा गावात आदिवासी ठाकर समाजाने मोठ्या उत्साहात आठ वधूंचे सामूहिक विवाह सोहळे साजरे केले. दूरदूरवरून नातेवाईक, मित्रमंडळी, वऱ्हाडी इथे जमली होती. मंगलमय वातावरणात सायंकाळी चारच्या सुमारास लग्नविधी पार पडले. त्यानंतर सर्वांसाठी भोजन आयोजित करण्यात आले होते. भात, मटकीची उसळ, बटाट्याची भाजी आणि गोडसर बुंदीचा मनसोक्त आस्वाद सर्वांनी घेतला. परंतु कोणालाही कल्पना नव्हती, की या भोजनाच्या थेट परिणामाने काही तासांतच सर्वांचे आयुष्य उलथापालथ होणार आहे.

शनिवारी पहाटे वऱ्हाड्यांमध्ये उलटी, जुलाब, अशक्तपणा आणि चक्कर येण्याची लक्षणे दिसू लागली. काही रुग्णांची स्थिती इतकी बिकट झाली की, तातडीने करंजखेड, नागापूर आणि आजूबाजूच्या रुग्णालयांत त्यांना दाखल करावे लागले. सर्वात वेदनादायक घटना म्हणजे, करंजखेड आरोग्य केंद्रात उपचार सुरू असताना 7 वर्षीय सुरेश गुलाब मधे या बालकाचा मृत्यू झाला. निष्पाप सुरेशचा अकाली मृत्यू संपूर्ण समाजाला सुन्न करणारा ठरला.

१७ जणांची प्रकृती गंभीर

सुमारे 600 बाधित रुग्णांपैकी 17 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. गंभीर रुग्णांमध्ये भागाबाई बुंधा मेंगाळ, गंगुबाई बुंधा मधे, रखमाबाई लक्ष्मण मथे, वनिता तुकाराम मेंगाळ, काळूबाई मनोज मेंगाळ, आदित्य तुकाराम मेगाळ, गायत्री गुलाब मधे आणि संदीप मधे यांचा समावेश आहे.

आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानुरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योगेश सोळुंके आणि डॉ. लहाने यांनी करंजखेड व नागापूर आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या. विशेष वैद्यकीय पथकांच्या मदतीने बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून, विषबाधेचे मूळ कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. स्वयंपाकाच्या दर्जावर संशय व्यक्त करण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com