Mumbai : मुंबईत घर घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ; गेल्या चार महिन्यात 52 हजार घरांची झाली विक्री
मुंबईमध्ये स्थायिक होण्याची, इथे राहण्याची इच्छा बहुतांश लोकांना होते. अनेकदा कामानिमित्त परराज्यातून लोकं मुंबईत येतात आणि कालांतराने इथेच राहू लागतात. मग सुरू होतो प्रवास स्वतःच्या हक्काच्या घराचा. मुंबई आपले स्वतःचे घर असणे हे कित्येकांचे स्वप्न असते. काही हे स्वप्न लवकर पूर्ण होते. तर काहींना वेळ लागतो. अशाच 52 हजार 896 लोकांच मुंबई घर घेण्याच स्वप्न गेल्या चार महिन्यांत पूर्ण झालं आहे.
या वर्षी जानेवारी ते एप्रिल या कालावधीत मुंबईत 52 हजार 896 घरांची विक्री झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी हा आकडा 48 हजार 819 इतका होता. मुंबईतील घरांच्या विक्रीसंदर्भात रियल एस्टेट कन्सल्टंट अॅनारॉकने नुकताच एक अहवाल जारी केला आहे.
जानेवारी ते एप्रिलमध्ये 52 हजार 896 घरांची विक्री झाली असून त्यापैकी सर्वाधिक म्हणजे 15 हजार 501 घरे मार्च महिन्यात विकली गेली आहेत. तर एप्रिल महिन्यात 13 हजार 80 घरांची विक्री झाली असून घरांच्या नोंदणीतून राज्य शासनाच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाला चार महिन्यात 4633 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. यातही 21 टक्के वाढ झाली आहे.