Mumbai News : वायू प्रदूषण रोखण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका अ‍ॅक्शन मोडवर...

Mumbai News : वायू प्रदूषण रोखण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका अ‍ॅक्शन मोडवर...

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या तब्बल 106 बांधकाम प्रकल्पांना ‘काम थांबवा’ (कार्य स्थगिती) नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

मुंबईतील वाढते वायू प्रदूषण रोखण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या तब्बल 106 बांधकाम प्रकल्पांना ‘काम थांबवा’ (कार्य स्थगिती) नोटीस बजावण्यात आल्या आहेत. संबंधित प्रकल्पांवर आवश्यक असलेली ‘एअर क्वालिटी सेन्सर्स’ अर्थात वायू गुणवत्ता मापन प्रणाली कार्यान्वित न केल्याने ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

महानगरपालिका प्रशासनाने यापूर्वीच सर्व बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी वायू गुणवत्ता मापन प्रणाली बसवणे बंधनकारक केले होते. तसेच 1 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च असलेल्या मोठ्या प्रकल्पांमध्ये ‘रेफरन्स ग्रेड एअर क्वालिटी मॉनिटर’ बसवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष तपासणीत अनेक प्रकल्पांनी या आदेशांकडे दुर्लक्ष केल्याचे उघडकीस आले. परिणामी, गुरुवारी सायंकाळपर्यंत 106 बांधकामांना तात्काळ काम बंद करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या.

वायू प्रदूषण प्रकरणी शुक्रवारी (दि. 23) न्यायालयीन सुनावणी होणार असून, त्याआधीच पालिकेने ही आक्रमक कारवाई केल्याचे स्पष्ट झाले आहे. पूर्वनियोजित कृती आराखड्यानुसार, महानगरपालिका प्रशासनाने सर्व विभागस्तरीय पथकांना प्रत्यक्ष स्थळभेटी, तपासणी, नोंदवही निरीक्षण आणि तात्काळ कारवाई सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन आढळताच कोणतीही सवलत न देता कारवाई केली जात आहे.

ही कारवाई केवळ बांधकाम क्षेत्रापुरती मर्यादित नसून, नियम न पाळणाऱ्या बेकरी युनिट्सवरही कार्य स्थगिती नोटीस देण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत. धूर, इंधन वापर आणि उत्सर्जन मानकांचे उल्लंघन करणाऱ्या युनिट्सवरही कडक पावले उचलली जाणार आहेत.

मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी ठाम भूमिका महानगरपालिका प्रशासनाने पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. नियमांचे पालन करणाऱ्या प्रकल्पांना सहकार्य केले जाईल, मात्र नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. या विविधस्तरीय उपाययोजनांमुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत हळूहळू सुधारणा होत असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com