"दसऱ्या मेळाव्यात शिवाजी पार्कच्या तिप्पट गर्दी एकनाथ शिंदे यांच्या भाषणासाठी होती" उदय सामंत
इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन मेळावे पार पडले. मेळाव्यात गर्दी जमवण्यासाठी चढाओढ लागली होती.आमच्याच मेळाव्याला सर्वात जास्त गर्दी होईल असा दावा केला जात होता. यातच आता दसऱ्या मेळाव्यात बिकेसी ग्राऊंड वर शिवाजी पार्कच्या तिप्पट गर्दी एकनाथ शिंदे यांच्या भाषणासाठी होती. या सगळ्याचे रिपोर्ट पोलिसांकडे आहेत. उद्धव ठाकरे गटाचे नेते स्वतःच स्वतःच समाधान करून घेत आहेत अशी टीका शिंदे गटातील नेते उदय सामंत यांनी केली आहे.
उदय सामंत म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे चालणारी एकनाथ शिंदे नेतृत्व करत असलेली हीच खरी शिवसेना आहे. हे राज्यातील जनतेलाही समजल आहे. भाषण करणाऱ्यांमध्ये माझं नाव होतं, मात्र, वेळ झाल्यामुळे पुढाकार घेऊन कोणीतरी थांबवणं गरजेचे होतं. सर्वांनीच भाषण केलं असतं तर रात्रीचे अकरा वाजले असते. म्हणून मी स्वतःहून थांबलो शिंदे साहेबांना सांगूनच मी भाषण केल नाही. कारण वेळेचा प्रश्न होता. त्यामध्ये नाराजीचा प्रश्नच येत नाही. असे सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान,राहुल शेवाळे यांनी शिंदेंच्या मेळाव्यात भाषण केलं होतं. यावेळी मला स्वप्नातही वाटलं नाही की, मी राहुल रमेश शेवाळे याला या व्यासपीठावर भाषण करण्याची संधी मिळेल. मी राहुल रमेश शेवाळे या नावाचा वापर वारंवार करत आहे, कारण मी कुणाचा बाप चोरलेला नाही. माझं नाव राहुल रमेश शेवाळे आहे. माझे वडील रमेश संभाजी शेवाळे हे होते, हे तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो. कारण वारंवार आमच्यावर आरोप होतो की माझा बाप चोरला, असं शेवाळे म्हणाले.