Operation Sindoor ON : लाहोरमधील Air Defence System उद्ध्वस्त; भारतीय लष्कराची अधिकृत घोषणा
पहलगाम हल्ल्याचा (Pahalgam Attack) बदला घेण्यासाठी भारताने हाती घेतलेल्या ऑपरेशन सिंदूरचा (Operation Sindoor) आज, गुरुवारी दुसरा टप्पा सुरू झाला. 6 मे रोजी मध्यरात्री दहशतवाद्यांची 9 तळ उद्ध्वस्त केल्यांनतर 8 मे रोजी भारताने सियालकोट, लाहोर आणि अन्य एका शहरातील सैन्याच्या एअर डिफेन्स युनिट्सवर (Air Defence Unit) हल्ला केला. भारताने लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टिम उद्ध्वस्त केली असून पाकिस्तानला हा मोठा दणका असल्याचे म्हटले जात आहे.
पाकिस्तानी लष्कराच्या एचक्यू-9 मिसाईल (HQ - 9 Missile) डिफेन्स सिस्टिम युनिट्सचं ड्रोन हल्ल्यांमुळे मोठं नुकसान झालं आहे. हे मिसाईल डिफेन्स सिस्टिम चीननं दिलेली आहे. लाहोरसोबतच गुजरावाला, रावळपिंडी, चकवाल, बहावलपूर, मियांवाली, कराची, मियानो, अटकमध्येही ड्रोन हल्ले झालेले आहेत. काल मध्यरात्री पाकिस्ताननं ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करुन अवंतीपुरा, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपुरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदिगढ, नल, फलोदी, उत्तरलाई, भुजसह उत्तर आणि पश्चिम भारतामधील अनेक लष्करी भागांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. पण भारतानं एअर डिफेन्स सिस्टिमचा वापर करुन पाकिस्तानचा प्रयत्न हाणून पाडला. केंद्र सरकारनं एक अधिकृत पत्रक जारी करत सगळ्या घडामोडींची आणि भारतीय सैन्यानं केलेल्या कारवाईची माहिती दिली आहे. '
पीआयबीकडून सांगण्यात आले आहे की, 'आज म्हणजेच ८ मेच्या सकाळी भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील अनेक ठिकाणांवरील हवाई सुरक्षा रडार आणि यंत्रणांना लक्ष्य केलं. भारतानं पाकिस्तानला त्यांच्याच पद्धतीनं आणि तितक्याच ताकदीनं उत्तर दिलं. विश्वसनीय माहितीनुसार, लाहोरमधील एक हवाई सुरक्षा यंत्रणा उद्ध्वस्त झालेली आहे.'