Most Powerful Nation’s : भारताची मोठी झेप! जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत टॉप-3 स्थान
लोवी इन्स्टिट्यूटने प्रसिद्ध केलेला आशिया पॉवर इंडेक्स 2025 अहवाल भारताच्या (India) वाढत्या जागतिक प्रभावाची ठळक नोंद करून देतो. या अहवालात २७ आशियाई देशांचे मूल्यांकन आठ प्रमुख निकषांवर केले गेले आहे, लष्करी क्षमता, आर्थिक सामर्थ्य, संरक्षण नेटवर्क, राजनैतिक प्रभाव, सांस्कृतिक पोहोच, भविष्यातील क्षमता, लवचिकता आणि जागतिक संलग्नता. या सर्व सूचकांमध्ये भारताने प्रभावी कामगिरी करत जगातील तिसरी सर्वात शक्तिशाली शक्ती (Most Powerful Nation) म्हणून आपली स्थिती मजबूत केली आहे.
अहवालानुसार, भारताचा ४०.० गुणांचा स्कोअर त्याच्या सर्वांगीण सामर्थ्याची साक्ष देतो. गेल्या दशकभरात भारताने मजबूत आर्थिक वाढ, संरक्षण क्षेत्रातील आधुनिकीकरण, जागतिक राजनैतिक सहभाग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती यामुळे स्वतःला ‘मेजर पॉवर’ म्हणून सिद्ध केले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारताचा आवाज अधिक ठाम झाला असून सामरिक भागीदारीतही त्याने लक्षणीय वाढ साधली आहे.
दुसरीकडे, अमेरिका ८०.५ गुणांसह अव्वल क्रमांकावर असून ती अद्यापही पहिली महासत्ता आहे. मात्र या वर्षी तिचा प्रभाव कमी झाल्याचे अहवाल नमूद करतो. चीन ७३.७ स्कोअरसह दुसऱ्या क्रमांकावर असून, अमेरिकेच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न सातत्याने करताना दिसतो. आशिया आणि इंडो-पॅसिफिकमध्ये चीनची वाढती लष्करी आणि आर्थिक उपस्थिती ही या परिणामाची प्रमुख कारणे आहेत.
भारताच्या वाढीसोबतच जागतिक पटलावर पाकिस्तानची स्थिती मात्र आणखी कमकुवत झालेली दिसते. २०२४ मध्ये टॉप-१५ मध्ये असलेला पाकिस्तान या वर्षी १६ व्या स्थानावर घसरला आहे. आर्थिक अस्थिरता, अंतर्गत राजकीय असंतोष आणि मर्यादित राजनैतिक प्रभावामुळे पाकिस्तानची ‘प्रादेशिक शक्ती’ म्हणून ओळख कमी होत चालली आहे. भारताची सतत वाढणारी क्षमता आणि पाकिस्तानची घसरण या विरोधाभासामुळे दक्षिण आशियातील सामरिक समीकरणात महत्त्वाचे बदल दिसून येतात.
आशिया पॉवर इंडेक्सच्या ताज्या अहवालात जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि इंडोनेशिया या देशांनीही प्रभावी स्थान टिकवून ठेवले आहे. जपान ३८.८ स्कोअरने चौथ्या स्थानावर असून त्याचे तांत्रिक नेतृत्व आणि राजनैतिक प्रभाव वाढत असल्याचे दिसते. रशियाने ३२.१ गुणांसह पाचवा क्रमांक मिळवत २०१९ नंतर प्रथमच सुधारणा दर्शवली आहे, ज्याचे श्रेय चीन आणि उत्तर कोरियाशी वाढलेल्या धोरणात्मक भागीदारीला जाते.
भारताची प्रगती ही आकड्यांची प्रगती नसून एका वेगाने बदलणाऱ्या जागतिक पटलावरील परिवर्तनाचा भाग आहे. देशाच्या वाढत्या आर्थिक क्षमतेसह संरक्षण क्षेत्रातील गुंतवणूक, ‘सॉफ्ट पॉवर’ वाढविण्यासाठी केलेले उपक्रम आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमधील सक्रिय सहभाग याची नोंद जागतिक अहवालात सतत घेतली जात आहे. भारत हा जलद गतीने उभारी घेत असलेला देश असून पुढील दशकात तो अधिक मजबूत आणि निर्णायक जागतिक शक्ती बनेल, असा विश्वास या अहवालातून व्यक्त केला गेला आहे. या सर्व घडामोडींनी हे स्पष्ट होते की, भारत आता केवळ क्षेत्रीय नव्हे तर जागतिक शक्ती म्हणून स्थिरपणे उदयास येत आहे. आशिया तसेच जगभरात बदलत असलेल्या सामरिक समीकरणांत भारताची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
