Flights Fare Hike : मुंबई-दिल्ली, मुंबई-पुणे, विमान तिकीटाचे दर गगनाला भिडले; तिकीटाचे दर पाहून खिशाला कात्री
(IndiGo Flights Fare Hike ) इंडिगो एअरलाइनने अचानक मोठ्या प्रमाणावर उड्डाणे रद्द केल्याने देशभरातील प्रवाशांचे हाल झाले आहेत. कंपनीने तब्बल ९०० पेक्षा अधिक फ्लाइट्स रद्द केल्यानंतर मुंबई, दिल्ली आणि बेंगळुरू विमानतळांवर प्रचंड गर्दी झाली असून परिस्थिती रेल्वे स्टेशनची आठवण करून देणारी आहे. या गोंधळामुळे हजारो प्रवाशांना प्रवासासाठी इतर विमान कंपन्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. आकासा एअर, एअर इंडिया आणि स्पाइसजेटच्या फ्लाइट्सची अचानक मागणी वाढल्याने या कंपन्यांनी तिकीटांचे भाव प्रचंड वाढवले आहेत.
तिकीट दरात दोन ते चार पट वाढ
दिल्ली–मुंबई, दिल्ली–बेंगळुरू आणि चेन्नई–हैदराबादसारख्या व्यस्त मार्गावर तातडीच्या प्रवासासाठी तिकीट दर अक्षरशः गगनाला भिडले आहेत.
पूर्वी 5000 ते 7000 रुपयांच्या दरम्यान मिळणारी तिकिटे आता 15,000 ते 20,000 रुपये इतकी महाग झाली आहेत. मुंबई–दिल्ली मार्गावरील एका प्रवासाचे तिकीट काही ठिकाणी 30,000 ते 35,000 रुपये विकले जात आहे. परतीच्या प्रवासाचे बुकिंग करायचे झाल्यास 59,000 ते 60,000 रुपये मोजावे लागत आहेत. पर्याय नसलेल्या प्रवाशांना ही अवाजवी किंमत देऊनच प्रवास करावा लागत आहे.
‘संकटात संधी’ — विमान कंपन्यांचा दरवाढीचा खेळ
इंडिगोच्या रद्द झालेल्या फ्लाइटमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा प्रतिस्पर्धी कंपन्या उचलताना दिसत आहेत. प्रवाशांची अडचण लक्षात न घेता तिकीट दरात जबरदस्त वाढ करून त्यांचा आर्थिक शोषण सुरू असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
DGCA चा पाळत ठेवण्याचा दावा, परंतु कारवाई अद्याप नाही
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) इंडिगोच्या उड्डाण रद्दीकरणावर लक्ष ठेवत असल्याचे सांगत असले तरी तिकीट दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

