Indigo Airline : इंडिगोच्या क्रायसेसमध्ये मनमानी भाडेवाढीला ‘चाप’; मोदी सरकारने लागू केली ‘फेयर लिमिट’
इंडिगो विमान कंपनीची अनेक विमानं रद्द झाल्यानंतर अन्य विमान कंपन्यांनी त्यांच्या विमान प्रवासाच्या तिकिटांच्या किंमतीत भरमसाठ वाढ केली आहे. मोदी सरकारने आता याच मनमानी तिकीट दर वाढीला ब्रेक लावण्यासाठी ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला आहे. मनमानी भाडेवाढ रोखण्यासाठी सरकारने भाडे मर्यादा लागू केली आहेत. लागू करण्यात आलेले नियम सर्व विमान कंपन्यांना लागू असणार असून, भाडे मर्यादांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. ही भाडे मर्यादा परिस्थिती सामान्य होईपर्यंत लागू राहणार असल्याचेही केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मंत्रालय करणार रिअल-टाइम देखरेख
या काळात आपत्कालीन परिस्थितीत प्रवास करणाऱ्या नागरिकांना कोणताही आर्थिक भार सहन करावा लागू नये, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. एअरलाइन्स आणि ऑनलाइन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मवरील डेटा वापरून विमानभाड्यांचे रिअल-टाइम निरीक्षण मंत्रालयाकडून केले जाणार आहे. यात जर कोणतीही एअरलाइन निर्धारित नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले तर, तिच्याविरुद्ध त्वरित कारवाई केली जाईल.
इंडिगोची विमानं रद्द झाल्यानंतर भरमसाठ भाडेवाढ
इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द झाल्यानंतर, इतर विमान कंपन्यांचे भाडे गगनाला भिडले आहे. उदाहरणार्थ, दिल्ली ते मुंबईचे भाडे, जे सामान्यतः ६,००० रुपये असते, ते आता सुमारे ७०,००० रुपये आहे. दिल्ली ते पाटणा हे भाडे, सामान्यतः ५,००० रुपये असते, ते आता ६०,००० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. दिल्ली ते बेंगळुरू हे भाडे, जे सामान्यतः ७,००० रुपये असते, ते आता १ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. शिवाय, दिल्ली ते चेन्नईचे भाडे ९०,००० रुपये आहे आणि दिल्ली ते कोलकाता हे भाडे सुमारे ६८,००० रुपये आहे.
