India-Pakistan War - IPL 2025 : देशातील तणावपूर्ण वातावरणामुळे IPL चे सामने अनिश्चित काळासाठी स्थगित
भारत-पाकिस्तानदरम्यान वाढलेल्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर, 2025 चा आयपीएल हंगाम अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आला आहे. 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून, त्यामुळे IPL खेळाच्या पुढील सामनांच्या आयोजनावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
धर्मशाळा येथे पंजाब आणि दिल्ली यांच्यात सुरू असलेला सामना, जम्मू आणि पठाणकोट परिसरात हवाई हल्ल्याचा इशारा मिळाल्यानंतर थांबवण्यात आला. या घटनेनंतर भारतीय क्रिकेट मंडळाने (BCCI) तातडीची बैठक बोलावून संपूर्ण स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. "देश अशांततेच्या स्थितीत असताना खेळाचं आयोजन करणं योग्य नाही," असे मत मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केलं.
या निर्णयामुळे 25 मे रोजी कोलकात्यात होणारा अंतिम सामना तसेच उर्वरित सामने सध्या अनिश्चिततेच्या सावटाखाली आले आहेत. सुरुवातीला 9 मे रोजी लखनौ आणि बंगळुरू यांच्यातील सामना नियोजित वेळापत्रकानुसार होईल, अशी माहिती देण्यात आली होती. मात्र, परिस्थिती अधिक गंभीर होत गेल्याने तो निर्णयही मागे घेण्यात आला. आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी स्पष्ट केलं की, "पुढील पावले केवळ केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार आणि सुरक्षेच्या स्थितीचा आढावा घेतच उचलली जातील. पुढील सूचना येईपर्यंत हंगाम स्थगित राहणार आहे."