Ajit Pawar : लोकप्रतिनिधींचं रखडलेली विकासकामं अपयश नाही का? उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सवाल

Ajit Pawar : लोकप्रतिनिधींचं रखडलेली विकासकामं अपयश नाही का? उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सवाल

कर्जत शहरातील रखडलेली विकासकामे ही येथील लोकप्रतिनिधी यांचे अपयश नाही काय, असा प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

कर्जत शहरातील रखडलेली विकासकामे ही येथील लोकप्रतिनिधी यांचे अपयश नाही काय, असा प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. कर्जत येथील नेत्यांनी शहराच्या विकासाऐवजी आपल्या कुटुंबाचे भले केले, असे बोलले जात असून या ठिकाणी दुसरीकडे गुंडगिरी वाढली आहे, याची देखील मला माहिती आहे. त्याचवेळी कर्जत मतदारसंघात खोऱ्याने ओढण्याचे जे काम सुरू आहे, ते थांबवा. सुरक्षित जीवन जगण्यासाठी अशी कामे करण्यासाठी परिवर्तन घडवावे, मागील वर्षी थोडक्यात हुकले ते आता भरून काढायला हवे, असे स्पष्ट आवाहन पवार यांनी केले.

आरोप आणि टीकेकडे लक्ष देत नाही

कर्जत येथील जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची येथे वेगळी युती पाहायला मिळाली असून महाविकास आघाडीमधील अनेक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे, असं सांगितलं. आरोप आणि टीका यांच्याकडे मी लक्ष देत नाही, पण मी सकाळपासून जनतेच्या कामात असतो, मात्र या ठिकाणी महिलांसाठी खास स्वतंत्र स्वच्छतागृह करायला नको का, येथील नेतृत्वाचे काम नको का, असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला. रायगड जिल्ह्यात विमानतळामुळे मोठ्या प्रमाणावर उद्योग-व्यवसाय, नागरीकरण वाढणार आहे. निवडून आल्यावर सार्वजनिक कामे होत असताना ती कामे पूर्ण होण्यासाठी त्या कामांची अडचण दूर करीत असतात. कर्जत येथील पूल का रखडला आहे, ते कर्जत शहरातील जनतेला माहिती आहे.

सर्वधर्मीयांचा विचार करूनच शहराचा विकास आराखडा बनला पाहिजे

कर्जत येथे वीज निर्मिती होते तरी देखील कर्जत शहराला चांगले आणि पुरेसे पाणी मिळत नाही, ही येथील लोकप्रतिनिधी यांचे फेलियर नाही काय? असा प्रश्न अजित पवार यांनी केला. मी पहिल्यांदा बारामती मॉडेल तयार केले असून आठ आठ वेळा निवडून आलो. अंगात धमक असेल तर निवडून गेल्यावर खोऱ्याने ओढायचे ही वृत्ती नको, असे सांगत त्यांच्या नेतृत्वाचा दोष आहे म्हणून त्याच्या कर्तृत्वाकडे पाहत नाहीत आणि म्हणून विचार करून मतदान करावे, असे आवाहन केले. शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि त्यामुळे सर्वधर्मीय यांचा विचार करून शहराचा विकास आराखडा बनला पाहिजे, असे आवाहन केले,

कर्जत शहराला २४ तास पाणी का नाही?

आमच्या श्रीवर्धन, रोहामध्ये तेथील नागरिकांना २४ तास पाणी आहे. येथे तुमच्यात दम आहे तर मग तुम्ही पाच वर्षांत कर्जत शहराला २४ तास पाणी का देत नाहीत? ज्यांना दुसऱ्यांदा आमदारकी मिळाली त्यांना व्यवहाराच्या शहाणपणाबद्दल मी बोलू शकत नाही. त्यासाठी अक्कलसुद्धा असावी लागते आणि अधिक बोलायला लावू नका. मी तर एक डासदेखील मारला नाही आणि त्यामुळे तुमच्यावर एवढे गुन्हे कशासाठी दाखल झाले, याचा अभ्यास करावा, असे आवाहन केले.

‘डीएनए’ या शब्दाचा लाँग फॉर्म सांगा: खा. तटकरे

खासदार सुनील तटकरे आपल्या भाषणात म्हणाले, कर्जत शहरातील रस्ते आणि कर्जतच्या आजूबाजूचे रस्ते अजित पवार यांच्यामुळे झाले आहेत. हे माजी आमदार देखील नाकारू शकत नाही. पाच वर्षे काम केले. डीएनए काढला तर मी त्यांना एकच सवाल करतो त्यांनी डीएनए यांचा लौंग फॉर्म सांगा. माझ्या ४० वर्षाच्या सार्वजनिक राजकारणात एकही केस नाही, तुमचा सातबारा काढला तर सर्व पिनल कोड पूर्ण होतील, अशी टीका यावेळी केली. अलीकडच्या काळात मिळालेले नेतृत्व कशा पद्धतीचे आहे हे सांगण्याची गरज नाही आणि त्यामुळे सुमंत राऊत, बी. एल. पाटील, देवेंद्र साटम, सुरेश लाड यांचे सुसंस्कृत नेतृत्व केले आहे, हे यानिमित्ताने सांगण्याची गरज आहे. कर्जत शहरात सांस्कृतिक परंपरा आहे आणि या शहरात रोहा शहरात आहे, त्यापेक्षा भव्य नाट्यगृह पुढील एक वर्षात उभे केले जाईल, असे आश्वासन दिले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com