Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

"'जय भवानी' शब्द काढणार नाही, आधी मोदी, शहांवर कारवाई करा..."; उद्धव ठाकरेंचं निवडणूक आयोगाला रोखठोक उत्तर

उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला.
Published by :

Uddhav Thackeray Press Conference : मशाल प्रचार गीतात जय भवानी, जय शिवाजी ही घोषणा आहे. त्यात असलेला जय भवानी शब्द काढा, असं निवडणूक आयोगानं म्हटलंय. आम्ही जय भवानी शब्द कोणत्याही परिस्थितीत काढणार नाही. आमच्यावर कारवाई करणार असाल, तर मोदी आणि शहांवर आधी कारवाई करा. महाराष्ट्राच्या कुलदैवताचा अपमान तुम्ही केला, हा आरोप मी केला, तर यावर निवडणूक आयोगाकडे उत्तर आहे का? तुम्ही आम्हाला वैरी केलंत, जनता बघून घेईल. पण महाराष्ट्राच्या दैवताचा उल्लेख करायचा नाही. जय भवानी, जय शिवाजी या घोषणेतील जय भवानी शब्द काढायला लावत आहेत. उद्या तुम्ही जय शिवाजी शब्द काढायला लावाल, तर अशी हुकूमशाही पद्धत आम्ही स्विकारणार नाही. आम्ही लढाई लढत राहू, असं उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले.

पत्रकार परिषदेत ठाकरे पुढे म्हणाले, गेल्या काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेश, तेलंगणा, कर्नाटकची निवडणूक झाली. आम्ही निवडणूक आयोगाकडे विचारणा केली होती. शिवसेनाप्रमुखांचं निवडणूक लढवण्याचा किंवा मतदान करण्याचा अधिकार अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना निवडणूक आयोगाने काढून घेतला होता. त्यांना सहा वर्ष निवडणूक लढवायला बंदी केली होती. त्या काळात त्यांनी हिंदुत्त्वाचा प्रचार केला, असा ठपका ठेवला होता. त्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आपले पंतप्रधान आणि गृहमंत्री उघडपणे धार्मिक प्रचार करत आहेत. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहून विचारणा केली होती की, यांना तुम्ही काही सूट दिली आहे का? निवडणुकीच्या कायद्यात काही बदल केला आहे, कारण पूर्वी आम्हालाही असा अनुभव आला होता. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा बजरंग बली की जय बोलून बटण दाबायला सांगतात.

भाजप सरकार आल्यानंतर रामलल्लाचं दर्शन मोफत करून देऊ, असं अमित शहा म्हणतात. त्यामुळे निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या नियमात बदल केला आहे का, हे आम्हाला पाहायचं होतं. पण निवडणूक आयोगाकडून आम्हाला काहीही उत्तर आलं नाही. त्यांनी आम्ही सांगितलं होतं, एकतर तुम्ही याचं उत्तर द्या, नाहीतर तुम्ही हा नियम बदलला आहे, असं आम्ही गृहीत धरू. पण आम्ही जर का असा पद्धतीने प्रचार केला, तर आमच्यावर कारवाई करता येणार नाही. जर नियम बदलला नसेल, तर यांच्यावर काय कारवाई केली आहे, ते आम्हाला सांगा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची निशाणी आता मशाल आहे. निवडणूक म्हटल्यावर प्रेरणागीत लागतं. पूर्वीचं आमचं शिवसेनेचं गीत लोक गावागावात आवडीने ऐकतात. तशाचप्रकारे मशालगीत आम्ही शिवसेना भवनात प्रदर्शित केलं होतं.

पण निवडणूक आयोगाने पत्र देऊन या गीतामध्ये असलेले दोन शब्द काढायला सांगितलं आहे. हिंदू हा तुझा धर्म, जाणून घे हे मर्म, जीवन कर त्यास तु बहाल. यामध्ये असलेला हिंदू धर्म हा शब्द त्यांनी काढायला लावलेला आहे. आमच्यावर जे टीका करतात, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. त्या राज्यकर्त्यांच्या हाताखाली निवडणूक आयोग काम करतात. हिंदू धर्म काढायला लावणं, हे योग्य आहे का, हे त्यांनी सांगावं. आम्ही हिंदू धर्माच्या आधारावर मत मागितलं नाही. पण आम्ही हिंदूत्व सोडलं, हे बोलणाऱ्यांनी आणि निवडणूक आयोगानं यावर उत्तर द्यायला पाहिते.

नरेंद्र मोदी म्हणालेत, बजरंग बली की जय बोलून तुम्ही बटण दाबा. अमित शहा म्हणाले, तुम्ही आम्हाला मत द्या, आम्ही तुम्हाला रामलल्लाचं दर्शन घडवू. आम्हीसुद्धा रामभक्त आणि हनुमानभक्त आहोत. आई तुळजाभवानी महाराष्टाचं कुलदैवत आहे. तुळजाभवानी मातेनं छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिलं. भवानी तलवारीचा प्रसंगही सर्वांच्या हृदयात कोरला गेला आहे. जय भवानी, जय शिवाजी, ही घोषणा प्रत्येकाच्या हृदयात आहे. उद्या आम्ही हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी असं बोललो तर निवडणूक आयोगाचा आक्षेप असता कामा नये.

निवडणुकीचा मतदानाचा महाराष्ट्रातील पहिला टप्पा पार पडला आहे. निवडणुकीच्या इतर टप्प्यांचा प्रचार हळूहळू तापायला लागला आहे. आजच मी बुलढाण्याला जाणार आहे. विदर्भ, मराठवाड्याचा एक-दोन दिवसाचा माझा प्रचाराचा दौरा सुरु होणार आहे. प्रचारात मूळ मुद्दे बाजूला पडतात की काय, अशी शंका निर्माण झालीय. मूळ मुद्दे जे खरे आहेत, म्हणजे दहा वर्षे मोदी सरकारने काय केलं, याला बगल दिली जात आहे. दुसऱ्याच मुद्द्याला महत्त्व देऊन जनतेची दिशाभूल केली जाते, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com