मुंबई गोवा महामार्गासाठी रायगडातील पत्रकार आज रस्त्यावर
भारत गोरेगावकर: रायगड | मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरी करणास झालेला विलंब आणि या मार्गाची सध्याची दुरवस्था याचा निषेध करून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील पत्रकार आज रस्त्यावर उतरणार आहेत. मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कोलाड नाका इथं मानवी साखळी आंदोलन करण्यात येणार आहे.
गेली 12 वर्षे या महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या 84 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे ते देखील पूर्ण झालेले नाही. अजूनही कोकण वासियांना मोठमोठ्या खड्ड्यातून प्रवास करावा लागतो आहे. या एक तपाच्या कालावधीत शेकडो निष्पाप व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेकांना अपंगत्व आले. शासन आणि प्रशासकीय यंत्रणा यांचे याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात येणार आहे. सकाळी 10.30 वाजता सुरू होणाऱ्या या आंदोलना दरम्यान वाहतुकीला कोणताही अडथळा आणला जाणार नाही, अशी माहिती रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर यांनी दिली.