देशाच्या सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांची नियुक्ती, 9 नोव्हेंबर रोजी शपथ घेणार
न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायमूर्ती यूयू ललित यांच्या निवृत्तीनंतर ते या पदाची शपथ घेणार आहेत. केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करून राष्ट्रपतींनी डॉ. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांची 9 नोव्हेंबर 2022 पासून भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. ते देशाचे 50 वे सरन्यायाधीश असतील. त्यांचा कार्यकाळ 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत असणार आहे.
केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, "भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करून, राष्ट्रपतींनी डॉ. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांची 9 नोव्हेंबर 2022 पासून भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे."
यांनी केली होती डीवाय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस
देशाचे सध्याचे सरन्यायाधीश यू. यू. लळीत यांनी 26 ऑगस्ट रोजी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली होती. लळीत यांचा कार्यकाळ केवळ 74 दिवसांचा होता ते आता 8 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यापूर्वी त्यांनी केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी सरन्यायाधीशांना पत्र पाठवत उत्तराधिकाऱ्याचे नाव पाठवण्याबाबत कळवले होते. त्यानुसार लळीत यांनी न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली होती.
कोण आहेत न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड?
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी मे 2016 मध्ये पदभार स्वीकारला होता. त्यांचे वडील वायव्ही चंद्रचूड हेही देशाचे सरन्यायाधीश राहिले आहेत. सर्वाधिक काळ CJI राहण्याचा विक्रमही वायव्ही चंद्रचूडच्या नावावर आहे. 1978 ते 1985 या काळात ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1959 रोजी झाला. चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून एलएलबी केले आहे. 1998 मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून नामांकन मिळाले. ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशही राहिले आहेत.