'ठाकरे बघून गेल्यावर अर्ध्या तासात आनंद दिघेंचा मृत्यू' मीनाक्षी शिंदेच्या दाव्यावर केदार दिघेंची प्रतिक्रिया
शिंदे गटाच्या नेत्या आणि ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी आनंद दिघे मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहे. आनंद दिघे यांच्यावर उपचार सुरू असताना उद्धव ठाकरे त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात आले आणि त्यानंतर ३० मिनिटांतच त्यांचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक दावा मिनाक्षी शिंदे यांनी केला आहे. त्यावर आता आनंद दिघे यांचे पुतणे आणि ठाकरे गटाचे नेते केदार दिघे यांनी या आरोपावर शिंदे गटाला प्रत्युत्तर दिलं आहे.
केदार दिघे म्हणाले, आनंद दिघेंचा मृत्यू झाला तेव्हा अनेक नेते त्यांना भेटून गेले. त्यात उद्धव ठाकरे, नारायण राणे, राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि अनेक स्थानिक नेत्यांचा समावेश होता. हे धर्मवीर चित्रपटातही आपण पाहिलं. मिनाक्षी शिंदेंना संशय निर्माण करायचा असेल तर भेटून गेलेल्या प्रत्येकाकडे संशयाची सुई जाईल. अस एका माध्यमाशी बोलताना म्हणाले.
या २२ वर्षात ही सर्व मंडळी याच शिवसेनेत होते. त्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते. या लोकांनी उद्धव ठाकरेंच्या आदेशाने, त्यांच्या अध्यक्षतेखाली अनेक पदं उपभोगली. हे सर्व उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असलेल्या पक्षातूनच नगरसेवक, आमदार, मंत्री झाले. आता २२ वर्षांनंतर त्यांना हे आठवतं आहे. मला वाटतं हे स्वार्थी राजकारण सुरू आहे” असं मत केदार दिघे यांनी व्यक्त केलं.
दरम्यान, रोशनी शिंदेंची प्रकृती ठीक असल्याचे दोन डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र, तरीही तरीदेखील त्यांना वारंवार रुग्णालयात दाखल केलं जात आहे. रोशनी शिंदेची प्रकृती ठिक असतानाही तिला गंभीर दुखापत झाल्याचं ठाकरे गटाकडून दाखवण्यात येत आहे. रोशनी गर्भवती नाहीये आणि आता तर तिला बोलताही येत नसल्याचं ठाकरे गटाचे नेते सांगत आहे, त्यामुळं हा प्रकार का आणि कशासाठी केला जात आहे, हे सर्वांनाच कळलं असल्याचंही मिनाक्षी शिंदे यांनी म्हटलं आहे.