Kishori Pednekar : 'परप्रांतियांनी दादागिरी वाढलीए, आता तरी ठाकरे बंधूंनी...'; किशोरी पेडणेकरांनी मांडला मुंबईसाठी महत्वाचा मुद्दा

Kishori Pednekar : 'परप्रांतियांनी दादागिरी वाढलीए, आता तरी ठाकरे बंधूंनी...'; किशोरी पेडणेकरांनी मांडला मुंबईसाठी महत्वाचा मुद्दा

मुंबईतील परप्रांतीय वर्चस्वावर किशोरी पेडणेकरांचा ठाकरे बंधूंना आवाहन.
Published by :
Riddhi Vanne
Published on

मुबंई सारख्या शहरात मराठी माणसापेक्षा परप्रांतीयांचे लोंढे वाढत चालले आहेत यांना कुठे तरी आळा बसला पाहिजे. यासाठी राजकारणामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र आले पाहिजे असे मत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केले आहे.

मुंबईमध्ये 2022पासून मराठी माणसाचे मुंबईमधील वर्चस्व कमी झाले असून परप्रांतीय लोक दादागिरी करताना दिसत आहेत. त्यांच्या दबावाखाली मराठी माणसाचा आवाज दबत चालला आहे, परप्रांतीयांचा दबदबा मुंबईवर वाढत चालला आहे. त्यांचा हा माज जर कमी करायचा असेल तर राजकारणात आवश्यक ते बदल घडणे ही काळाची गरज आहे. परप्रांतीय लोक मुंबईमध्ये नोकरी धंद्यासाठी येतात आणि आपला मराठी माणूस मानाने चांगला असल्यामुळे सगळयांना सामावून घेतो, मात्र याच साधेपणाचा फायदा घेत परप्रांतीय लोक आपल्या डोक्यावर बसत चालले आहेत. त्यांची दादागिरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यामुळे महाराष्ट्राचे भवितव्य धोक्यात आहे. जर महाराष्ट्राचे भविष्य उज्वल करायचे असेल तर त्यासाठी ठोस पाऊले उचलणे ही काळाची गरज झाली आहे. आणि त्यासाठी मराठी माणसाची ताकद वाढली पाहिजे.

त्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूनी एकत्र आले पाहिजे जेणेकरून महाराष्ट्राच्या हिताच्या पर्यायाने मराठी माणसाच्या हिताच्या गोष्टी घडू शकतील. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रीकरणाच्या चर्चेला याआधीच उधाण आले असून जर हे बंधू एकत्र आले, तर मुंबईवरील परप्रांतीयांचे वाढते वर्चस्व निश्चितच कमी होईल यात शंका नाही असे मत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केले आहे. या दोन भावांचे एकत्रीकरण निश्चितच परप्रांतीयांच्या दादागिरीची धार बोथट करतील यात शंका नाही असं ही किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com