Monsoon
MonsoonTeam Lokshahi

राज्यात अनेक ठिकाणी कोसळधारा; कोल्हापुरात पर्यटक अडकले

बाहेर पडण्यास अन्य कोणताही मार्ग नसल्यामुळे बंधाऱ्यावरील पाणी कमी होईपर्यंत पर्यटकांना वाट पहावी लागणार आहे.
Published by :
Sudhir Kakde

Maharashtra Monsoon Updates : राज्यभरात सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु आहे. आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. कोल्हापुरात सुद्धा जोरदार पावसानं हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे बर्की बंधारा पाण्याखाली गेला असून, काही पर्यटक अडकल्याची माहिती समोर आली आहे. धबधब्याकडे गेलेले पर्यटक परत येण्यासाठी रस्ता नसल्याने अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. मागील दोन दिवसांपासून शाहूवाडी पश्चिम भागात अणूस्कुरा व गेळवडे धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. दुसरीकडे कासारी नदी सुद्धा दुथडी भरून वाहते आहे. अचानक पाऊस वाढल्यामुळे बर्की बंधारा पाण्याखाली गेला आहे. बाहेर पडण्यास अन्य कोणताही मार्ग नसल्यामुळे बंधाऱ्यावरील पाणी कमी होईपर्यंत पर्यटकांना वाट पहावी लागणार आहे.

रायगडलाही पावसानं झोडपलं...

रायगड जिल्ह्याला आज दिवसभर पावसाने झोडपलं आहे. महाड शहरातील नद्यांच्या पात्रात पाणी मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. तसंच सखल भागात सुद्धा पाणी साचायला सुरूवात झाली आहे. दस्तुरी नाका ते रायगड रोडवर सुद्धा पाणी साचलं आहे. पुरसदृष्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता सध्या निर्माण झाली आहे. त्यामुळे आता शहरातील नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. दिवसभरात 140 मी. मी. पावसाची नोंद आज झाली आहे.

भिवंडी शहरात मुसळधार पावसामुळे सखल भागात साचले पाणी...

भिवंडी परिसरात मुसळधार पाऊस सुरु असून, शहरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तिनबत्ती बाजार पेठेत पाणी साचल्याने दुचाकी चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. मुसळधार पाऊस सुरु असून, असाच पाऊस सुरु राहिल्यास शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली काळजी घेणं गरजेचं असल्याचं आवाहन करण्यात येत आहे.

कल्याणमध्ये दरड कोसळली

कल्याण पूर्व भागातील हनुमाननगर परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. मूसळधार पावसामुळे दरड कोसळली असून, सुदैवाने जिवीत हानी मात्र झालेली नाही. आसपासच्या पाच कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून, केडीएमसी अधिकारी हेमा मुंबरकर यांनी ही माहिती दिली आहे.

सकाळी ८ः३० ते संध्याकाळी ५ः३० पर्यंत कुठे किती पाऊस झाला?

पणजी - ८८.६ मिमी

महाबळेश्वर - ९४.६ मिमी

मुंबई (कुलाबा) - २७ मिमी

मुंबई (सांताक्रुज) - १९.२ मिमी

कोल्हापूर - २१.८ मिमी

रत्नागिरी - ५१.३ मिमी

अलिबाग - २४.३ मिमी

ठाणे - ५९ मिमी

माथेरान - ७० मिमी

डोंबिवली - १०४ मिमी

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com