Kolhapur : गुलाबी रंगात रंगलेली शेळकेवाडी; 100% सौर ऊर्जेवर चालणारे पहिले गाव
करवीर तालुक्यातील डोंगराळ भागात वसलेलं छोटं आणि शांत गाव म्हणजे शेळकेवाडी. अवघ्या हजार लोकसंख्येचं हे गाव, केवळ 100 घरांचं असून पूर्वी विकासापासून दूर होतं. महसूल उत्पन्न कमी असल्याने शासकीय योजना आणि राजकीय लक्ष यापासूनही शेळकेवाडी वंचित राहायचं. पण ग्रामस्थांच्या एकजुटीतून या गावानं प्रगतीचा नवा मार्ग शोधला. 2004 पासून विविध शासकीय योजनांमध्ये सहभाग घेत शेळकेवाडीनं आपलं नशिब पालटलं. हागणदारीमुक्त मोहिम, बायोगॅस प्रकल्प, तसेच 100% सौरऊर्जेवर चालणाऱ्या गावांमध्ये शेळकेवाडीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रत्येक घराला गुलाबी रंग दिल्यामुळे या गावाला 'पिंक व्हिलेज' असंही नाव मिळालं आहे l.
पंतप्रधान सूर्यघर योजनेअंतर्गत या गावात प्रत्येक घरात सौरऊर्जेची सुविधा पुरवली गेली आहे. 1 कि.व्हॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी लागणारा खर्च जवळपास 67 हजार रुपये असून, त्यातील केवळ 5 हजार रुपयेच ग्रामस्थांकडून घेण्यात आले. उर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकारच्या योजना आणि ग्रामपंचायतीच्या निधीतून भरली गेली. ग्रामपंचायतीनं विशेष निधी मिळवून प्राथमिक शाळा, अंगणवाडी, व्यायामशाळा, पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनेसुद्धा सौरऊर्जेवर कार्यान्वित केलं आहे. बायोगॅसचा वापर करून गावातील सगळ्या शौचालयांना जोडले आहे. ओला कचरा गॅस निर्मितीसाठी वापरण्यात येतो, तर सुका कचरा 'अवनी' संस्थेच्या सहकार्याने व्यवस्थापित केला जातो.
सांडपाण्याचं पुनर्वापर करून शेतीस मदत केली जाते. शोषखड्ड्यांच्या आजूबाजूला केळीची लागवडही करण्यात आली आहे. बंदिस्त गटारी, लोकसहभागातून उभारलेले बंधारे, आणि परसबागा अशा उपक्रमांमुळे शेळकेवाडी स्वच्छ आणि सुजलाम-सुफलाम झालं आहे. विद्युत उपकरणांचा वापर करूनही वीजबिल शून्यावर आल्यामुळे महिलांनी समाधान व्यक्त केलं आहे. येत्या काळात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाची टीम येथे पाहणीस येणार आहे.