India vs Pakistan War : वाशिमच्या जवानाचं देशप्रेम; लग्नांच्या दोन दिवसानंतर लगेचच सीमेवर रवाना
वाशिम जिल्ह्यातील जऊळका रेल्वे या गावचा सुपुत्र, कृष्णा राजू अंभोरे, याने आपल्या देशभक्तीची आणि कर्तव्यनिष्ठेची एक अनोखी मिसाल सादर केली आहे. नुकतेच त्यानं लग्नगाठ बांधली होती. परंतु लग्नाच्या केवळ दोनच दिवसानंतर सैन्यदलाकडून कर्तव्याची हाक आली आणि क्षणाचाही विलंब न करता त्याने देशसेवेसाठी तत्काळ प्रयाण केले. नवविवाहित पत्नीच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण कृष्णाच्या डोळ्यांत केवळ राष्ट्रसेवेचं समर्पण होतं. भावनांच्या काठावर उभं राहून, तात्काळ ड्युटीवर रवाना झाला.
आज , दुपारी २.३० वाजता तो उत्तराखंडमधील ड्युटीसाठी वाशिम रेल्वे स्टेशनवर पोहोचला, तेव्हा गावातील नागरिकांनी त्याला देशभक्तीच्या जयघोषांसह निरोप दिला. वातावरण देशप्रेमाने भरून गेले होते. गावकऱ्यांनी "जय जवान", "वंदे मातरम्" अशा घोषणा देत त्याचं कौतुक केलं. गावातील वृद्धांपासून लहानग्यांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर अभिमान स्पष्ट दिसत होता. कृष्णाचं हे पाऊल संपूर्ण वाशिम जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरलं आहे. "देश आधी, बाकी नंतर" हे त्याने आपल्या कृतिशील निर्णयातून सिद्ध केलं आहे.