Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेसंदर्भात फडणवीसांची मोठी घोषणा
विरोधकांकडून गेल्या काही महिन्यांपासून ‘लाडकी बहीण’ योजना लवकरच थांबणार असल्याचे आरोप सातत्याने होत आहेत. मात्र, वाशिममध्ये आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व दाव्यांना जोरदार प्रत्युत्तर देत योजनासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली., फडणवीस म्हणाले, “विरोधक कितीही बोलत राहोत, पण लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. एका वर्षात ही योजना उत्तमरित्या चालू ठेवण्यात आली आहे आणि जोपर्यंत ‘देवा भाऊ’ मुख्यमंत्रीपदावर आहे, तोपर्यंत ही योजना कायम सुरू राहील.” त्यांनी स्पष्ट केलं की राज्य सरकार महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ठोस पावलं उचलत आहे. “लाडक्या बहिणी केवळ लाडक्या बहिणी राहणार नाहीत, तर त्या आता ‘लखपती दीदी’ बनतील,” असे फडणवीस म्हणाले.
कार्यक्रमात त्यांनी या उपक्रमाचा आतापर्यंतचा यशस्वी प्रवासही मांडला. त्यांच्या म्हणण्यानुसार, राज्यात सुमारे 50 लाख महिलांना ‘लखपती दीदी’ म्हणून उभं करण्यात यश आलं आहे. यानंतर त्यांनी आणखी एक मोठा संकल्प जाहीर केला, “आम्हाला पुढील काळात आणखी 50 लाख महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवायचं आहे. लखपती दीदींचा आकडा 1 कोटींपर्यंत नेण्याचा आमचा निर्धार आहे.”
महिलांच्या स्वावलंबनासाठी सुरू केलेल्या विविध योजनांमुळे मोठ्या प्रमाणावर महिलांना रोजगार, बचत गटांद्वारे उत्पन्न, तसेच आर्थिक स्थैर्य मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. विरोधकांच्या आरोपांवर उत्तर देताना फडणवीस यांनी सरकारची भूमिका ठामपणे मांडली. “आमचा उद्देश महिलांचे जीवनमान उंचावणे हा आहे. या वाटचालीत कोणतीही योजना अर्धवट थांबणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी म्हणून फडणवीसांची ही घोषणा पाहिली जात असून, राजकीय वर्तुळातही या विधानाची व्यापक चर्चा सुरू झाली आहे.
